लोबोंच्या ‘बागा डॅक’, ‘नाझरी रिसॉर्ट’ला कारणे दाखवा नोटीस : कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम केल्याचा ठपका
- मायकल लोबो यांचाही राणेंवर जोरदार हल्लाबोल
- सनदा, दाखले रद्द केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा
- घरे, बांधकामे, उद्योग-व्यवसाय मोडणार काय?
प्रतिनिधी / पणजी
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या ‘बागा डॅक’ व ‘नाझरी रिसॉर्ट’ या दोन बांधकामांना नगरनियोजन खात्याने कारणे दाखवा नोटीस बाजावली असून दोन्ही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कायद्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे, तर ही दोन्ही बांधकामे आपल्या कारकिर्दीतच मोडणार असल्याचा इशारा नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे. तिसऱया बाजूने निलंबित करण्यात आलेल्या ओडीपीमध्ये देण्यात आलेल्या सनदा, दाखले रद्द केल्यास सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा लोबो यांनी दिल्याने हे प्रकरण आता बरेच ताणले गेले आहे.
या प्रकरणामुळे लोबोंच्या अडचणीत वाढ झाली असून ते आता कोणती भूमिका घेतात यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. सदर बांधकामांची कागदपत्रे 7 दिवसात सादर करावीत असे निर्देश नोटीसीतून देण्यात आले आहेत. त्याचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोबोंची दोन्ही बांधकामे पाडणार
लोबो यांच्या ‘बागा डॅक’ व ‘नाझरी रिसॉर्ट’ या दोन्ही बांधकामांवर कारवाई म्हणजे दोन्ही बांधकामे मोडू शकतात, असे स्पष्टीकरण नोटीसीतून करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे दोघांमध्ये अर्थात आजी-माजी मंत्र्यांत वादाची ठिणगी पडली असून या वादाचे पुढे काय होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
यापुर्वी लोबोंच्या विरोधात एकआयआर
मागे काही दिवसांपूर्वी डोंगर कापणी केल्याच्या आरोपावरुन लोबोंच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यासाठी राणे यांनीच पुढाकार घेतला होता आणि आताही त्यांनीच पुढाकार घेऊन या नोटिसा बजावण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
लोबो यांचा राणेंवर जोरदार हल्लाबोल
निलंबित करण्यात आलेल्या ओडीपी अंतर्गत (बाहय़ विकास आराखडा) देण्यात आलेले दाखले, सनदा रद्द केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिला आहे. मंत्र्यांनी व सरकारने त्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी लोबो यांनी केली असून मंत्री विश्वजित राणे हे गोव्याचे राखणदार होऊ शकत नाहीत अशी टिपणी देखील लोबो यांनी केली आहे. पर्वरी मंत्रालयात विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोबो यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.
ती बांधकामे मोडणार काय?
गोवा वाचवण्याची त्यांची भाषा हा केवळ देखावा असल्याची टीका करून लोबो म्हणाले की निलंबित ओडीपीतून देण्यात आलेले दाखले, सनदा रद्द करण्याची भाषा राणे करतात परंतु ते चुकीचे आहे. अनेकांनी त्या दाखल्यांवरून घरे, हॉटेल्स इतर बांधकामे केली आहेत ती आता मोडणार काय? अशी विचारणा लोबो यांनी केली आहे.
ओडीपी रद्द केल्यास लोकांना त्रास
येणाऱया प्रत्येक मंत्र्यांने जर आधीचे ओडीपी रद्द केले तर त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागणार आहेत. लोक त्रासात पडणार असे सांगून त्यांना घेवून आपण न्यायालयात जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी लोबो यांनी केली आहे.