भारत अन् चीनकडे सैन्यबळाचा वापर करण्याचा पर्याय नाही
वृत्तसंस्था / जम्मू
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश भारत आणि चीनला स्वतःचे विवाद चर्चेद्वारेच सोडवावे लागतील. सद्यकाळात यासाठी सैन्यबळाचा वापर करणे निरर्थक ठरणार असल्याचे उद्गार बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी काढले आहेत.
शुक्रवारी सकाळी लडाखला रवाना होण्यापूर्वी जम्मूमध्ये प्रसारमाध्यमांनी बोलताना दलाई लामा यांनी शेजारी देशांमध्ये शांतता असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी जम्मूमध्ये शिक्षण घेत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सध्या जगात शांतता आणि बंधूभावाची सर्वाधिक गरज असल्याचे विधान केले आहे.
तिबेटी बुद्धिइजम विज्ञानावर आधारित धर्म असल्याचे चीनच्या रहिवाशांना कळून चुकले आहे. चीनचे काही कट्टरवादी अशा लोकांनाच फुटिरवादी मानतात. परंतु सर्वसामान्य लोकांना सत्य चांगलेच माहिती असल्याचे दलाई लामा म्हणाले. शुक्रवारी सकाळी ते जम्मू विमानतळावरून लेहसाठी रवाना झाले. दलाई लामा हे स्वतःच्या लडाख दौऱयादरम्यान सुमारे एक महिन्यापर्यंत लेहमध्ये वास्तव्य करणार आहेत. लेहच्या चोगलमसरमध्ये दलाई लामा हे स्थानिक लोकांना संबोधित करणार आहेत.