227 शाळांमधील 743 खोल्यांची जिल्हा परिषदेकडून तत्काळ दुरूस्तीची गरज
प्रतिनिधी/सातारा
जिल्हा परिषदेच्या शाळांची होत असलेली दुरावस्था ही विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या 227 शाळांच्या 743 खोल्या धोकादायक बनल्याचे जिह्यात चित्र आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळांच्या खोल्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र, शिक्षण विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिह्यात 2 हजार 745 शाळा आहेत. यामधील दहा टक्के शाळांच्या खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यातील काही शाळा या जिह्यातील दुर्गम भागातील आहेत. त्या भागात पाऊस अधिक प्रमाणात असतो. धोकादायक खोल्या असलेल्या शाळांमधील अनेक खोल्यांना तडे जाणे, छत गळणे, पत्र्यातून पावसाचे पाणी येणे यासारखी स्थिती आहे. या परिस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पध्दती सुरू केली असताना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज खोल्या असणे आवश्यक आहे. मात्र, झेडपीच्या काही शाळांमध्ये धोकादायक स्थितीत शिक्षण सुरू आहे. याबाबत काही शाळांच्या शिक्षकांनी शाळांच्या स्थितीबाबत शिक्षण विभागाला माहितीही दिली होती. परंतु शिक्षण विभागाच्या अधिकाऱयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
कराड तालुक्यात सर्वाधिक धोका
शाळांची तत्काळ दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना करण्याची गरज आहे. असे असताना जिह्यात तालुकानिहाय आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये सातारा तालुका 50, कोरेगाव 29, महाबळेश्वर 7, वाई 56, खंडाळा 70, फलटण 37, कराड 282, माण 42, जावली 29, पाटण 74, खटाव तालुका 67, अशा जिह्यातील 227 शाळांमधील एकून 743 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत.
झाडाखाली भरते शाळा
चिंचणी (ता. खटाव) गावातील शाळा धोकादायक स्थितीत आहे. त्या भागातील विद्यार्थ्यांची शाळा झाडाखाली भरत आहे. या शाळेत आठ खोल्या असून त्यातील एक खोली स्लॅबची आहे. ती देखील गळत आहे. त्यामधील लोखंडी सळ्या उघडय़ावर असून उर्वरित पत्र्याच्या दोन खोल्यांमधून पाणी झिरपत आहे. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना झाडाखाली बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.