राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची कार्यवाही धुमधडाक्यात सुरू झाली. विद्यापीठ अनुदान मंडळा (जे स्वतःच नष्ट होणार आहे) मार्फत, नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर, कार्यवाहीचा झपाटा वाढत आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची मुलभूत वैशिष्टय़े पुढील प्रकारची आहेत.
- उच्च शिक्षण संस्थांचे एकत्रीकरण
- विद्यार्थी संख्या केंद्रीकरण
- अभ्यासक्रम एकत्रीकरण
- संलग्नीकरण उच्चाटन
- प्रवेश व्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण
या सर्व गोष्टींचा एकच अर्थ होतो केंद्रीकरण! आपली राष्ट्रीय व्यवस्था संघराज्यात्मक आहे या गोष्टीचा विसर पडतो. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषमता व भिन्नता दुर्लक्षित केल्या जात आहेत.
अलिकडेच विद्यापीठ अनुदान मंडळाने देशातील 45 केंद्रिय विद्यापीठातील पदवी-पूर्व अभ्यासक्रमासाठी “सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा- Common University Entrance Test (CUET) लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.
वर वर पाहता, देशातील दुय्यम शिक्षण व्यवस्थांची-राज्य परीक्षा मंडळे, सीबीएसई, आय.सी.एस.ई. यांच्या परीक्षांच्या गुणवत्तेबद्दल व एकजीनसीपणाबद्दल शंका आहेत. अशा पार्श्वभूमीवर केंद्रीकृत प्रवेश परीक्षा व गुणवत्ता यादी यापुढे 1) उच्चतर अभ्यासक्रमास प्रवेश वस्तुनिष्ठ मुल्यनिरपेक्ष पद्धतीने देणे शक्य होईल अशी धारणा आहे. 2) अनेक प्रवेश परिक्षांना सामोरे जाण्याच्या संकटातून विद्यार्थी मुक्त होतील. 3) केंद्रीकृत प्रवेश परीक्षेमुळे विविध विद्यापीठ परीक्षांच्या “गुणांका’’वर आधारीत प्रवेशाचे स्तोम कमी होईल. 4) जेंव्हा प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते तेंव्हा केंद्रीकृत परीक्षाच छानणीचा प्रभावी मार्ग ठरतो. अशा केंद्रीकृत प्रवेश परीक्षेत-वस्तुनिष्ठता असते, व्यक्तीनिष्ठता कमी होते व गुणवत्तेचे त्रयस्थ/तटस्थ, गणिती, संख्यात्मक मापन होते. या सर्व गोष्टी खऱया असल्या तरी प्रमाणीकृत प्रवेश परीक्षेच्या मर्यादा समजून घेण्याचे धाडस करणेही आवश्यक आहे. या बाबतीत देशातील शिक्षण व्यवस्थेची काही लक्षणे लक्षात घेणे आवश्यक आहे. ती लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
शिक्षण व्यवस्था मुख्यतः ग्रंथाधारित व परीक्षाधीन आहे.
पाठांतर किंवा व्यूहरचना अध्ययन (कोचिंग क्लासेसची देणगी) हा या शिक्षणाचा कणा आहे.
अध्ययन व विस्मरण आनंद निर्मितीमधून न होता, विद्यार्थी परीक्षायोद्धा किंवा डावपेच तज्ञ होतो.
साप्ताहिक परीक्षा, मासिक परीक्षा, परीक्षा-नाटय़, नीट, जेईई, गणित व विज्ञानाच्या ऑलिंपीअड-यात आमचा विद्यार्थी घुसमटून जातो. कोचिंग क्लासेसची व्यवस्था सुविधा, संपन्नता, गुणवत्ता या बाबतीत उजव्या ठरतात. तेथील शुल्क व वेतन जबर असते. त्यांचा रूबाब विद्यापीठापेक्षा अधिक असतो. या सर्व व्यवस्थेत विज्ञान व गणित प्रभावीकरण असते. सार्वजनिक विद्यापीठे दुबळी
ठरतात.
सामाईक विद्यापीठ परीक्षेमुळे (CUET) यात बदल घडणार कां ? का नीट, नेट, सेट, प्रमाणेच याही परीक्षेची तयारी कोचिंग क्लासेसच करून घेणार व त्यासाठी आणखी जादा शुल्क घेणार?
प्रचलित उच्च शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन आनंद, नवनिर्मिती व प्रश्न निर्मिती करणारे होण्याऐवजी रोट पध्दतीचे (पाठांतर) होणार नाही का? नव्या व्यवस्थेत “राष्ट्रीय चाचणी व्यवस्था’’ चालविणारे परीक्षा तज्ञ, निर्मितीक्षम, कल्पक अध्यापकांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरणार! नव्या शिक्षण व्यवस्थेत-शिक्षण तंत्रविद्या (मंत्र) व व्यवस्थापक महत्त्वाचे ठरणार.
दुसरा एक तितकाच महत्त्वाचा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. सामान्यतः अशा प्रवेश परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर, वस्तुनिष्ठ प्रश्नांवर अवलंबून असतात. अशा बहुपर्यायी प्रश्नांमुळे-निर्मितीक्षम शोध, निर्वचनात्मक समज व स्वाध्यायी चिकित्सा या गोष्टी कमी महत्त्वाच्या होत जातात. वस्तुनिष्ठता, ठोकताळा, एकक अतिरेक (गणित-विज्ञानाप्रमाणे) साहित्य, कला, सामाजिक/ मानव्य शास्त्रs यांना लागू होणे / करणे बौद्धिक अत्याचार ठरेल.
छ. शिवाजी राजे धर्मनिरपेक्ष होते का किंवा छ.संभाजीराजे पूर्ण हिंदुत्ववादी होते का या प्रश्नांची उत्तरे होय/ नाही अशी देता येत नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अतिरेक करून निर्वचनाची पंडित परंपरा, वाद-विवाद क्षमता नष्ट होऊन सगळे शिक्षणच ठोकताळे बंद होईल. जन्म-मृत्युच्या तारखा, विवाहसंस्था, मुलांची संख्या, यापेक्षा जास्त कांही व्यक्तिमत्त्वाचा अर्थ असतो. अशा गोष्टींवरच भर दिल्यास आमच्या विद्यार्थ्यांची निर्मितीक्षम अभिव्यक्ती, वाद विवाद संस्कृती व स्पर्धात्मकता नष्ट होतील.
परीक्षा, परीक्षा-व्यवस्थापक, परीक्षा योध्दे-या सर्वांचा एकत्रित अर्थ शिक्षण नव्हे. सरकारी व्यवस्थेने निर्माण केलेली क्रमिक पुस्तके म्हणजे ज्ञान नव्हे. खरे ज्ञान संपादन क्रमिक पुस्तकांबाहेर व अभ्यास क्रमाबाहेर प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेत होते. राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) तज्ञ व्यवस्थापक-सरकारी हस्तक/ नियंत्रक संस्थेच्या अभ्यासक्रमाबाहेर जाण्याची शक्यता फारच कमी. एखादा प्रतिभाशाली शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शुंपीटरचे ग्रंथ, म. गांधींचे आत्मचरित्र, रविंद्र नाथांचे काव्य, अगाभा ख्रिस्तीची रहस्य कथा, जॅक लंडनच्या कथा वा हेमिंग्वेच्या कादंबऱया, ज्यूल्स व्हर्नच्या विज्ञानकथा वाचायला सांगेल व तो खरा शिक्षण संस्कार असेल.
म्हणून शैक्षणिक विकासासाठी आम्हास सामाईक प्रवेश परीक्षेच्या पलीकडे जावे लागेल. शाळांची गुणवत्ता वाचविण्यासाठी, जीवन मार्गी अध्यापन करणारे शिक्षक घडवावे लागतील. त्यासाठी नेट/ सेट चौकटीच्या पलीकडे योग्य संस्कार व प्रवृत्तीचे शिक्षक निवडावे लागतील. शिक्षण संस्थांना शैक्षणिक, प्रशासकीय, शुल्क व प्रवेशाची स्वायत्तता द्यावी लागेल. प्रत्येक विद्यार्थी एक स्वतंत्र, भिन्न अस्तित्व असते. याचा विचार करणे आवश्यक आहे.
भारतासारख्या अनेक भाषांच्या, सामाजिक संस्कारांच्या, नैसर्गिक भिन्नतेच्या, प्रचंड विषमतेच्या देशात महत्त्वाच्या शिक्षण संस्थांत-प्रवेश देण्यासाठी खास वेगळी परीक्षा व्यवस्था अधिकृतपणे चालू करणे, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक, अन्यायाचे ठरेल. शिक्षण “व्यक्ती’’ निर्माण करते-मशिनचे स्पेअर पार्टस् नाही!
प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, कोल्हापूर