71 हजारांहून अधिकांना लाभ, विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘रोजगार मेळय़ा’च्या माध्यमातून 71 हजारांहून अधिक जणांना नोकऱयांची नियुक्तीपत्रे वितरीत करण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱयांसमोर भाषण केले. सरकारी आणि बिगर सरकारी क्षेत्रांमध्ये आता नोकऱयांच्या संधी वाढत आहेत. युवकांना खेडी आणि शहरांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून आता ही प्रक्रिया वेगवान केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या रोजगार मेळय़ाची घोषणा सोमवारी करण्यात आली होती. मंगळवारी त्यानुसार नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. देशभरात 45 स्थानी अशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. खेडय़ांमध्येही आता नोकऱया उपलब्ध होऊ लागल्याने पोटापाण्यासाठी शहरांकडे स्थलांतरित होण्याचे दडपण आता कमी होऊ लागले आहे. तरुणांना ते रहात असलेल्या भागाचा विकास करण्याची संधी मिळू लागली असून हेच केंद्र सरकारचे प्रमुख ध्येय आहे. याचाच एक भाग म्हणून हा रोजगार मेळा आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कर्मयोगी प्रारंभ मोडय़ूलचा प्रारंभ
यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘कर्मयोगी प्रारंभ मोडय़ूल’चा शुभारंभ करण्यात आला. हा एक ऑनलाईन ओरिएंटेशन अभ्यासक्रम असून तो सर्व नवनियुक्त कर्मचाऱयांसाठी आहे. या अभ्यासक्रमात सरकारी कर्मचाऱयांसाठी आदर्श आचारसंहिता, कार्यस्थान शिष्टाचार आणि कार्यनिष्ठा हे विषय विशद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱयांना मिळणारे वेतन. इतर भत्ते, महागाई भत्ता इत्यादी बाबींची माहितीही देण्यात आली आहे. सरकारची विविध विषयांवरची धोरणे काय आहेत, याचीही माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.
रोजगारनिर्मितीचे धोरण
केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी रोजगारनिर्मितीची नवी योजना घोषित केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असणारी 10 लाखांहून अधिक पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. यांपैकी साधारणतः दोन लाख पदे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये भरली गेली आहेत. ही पदे शिक्षण, आरोग्य, प्रशासन, उत्पादन, सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, वैद्यकीय सेवा, परिचारक सेवा, इत्यादी क्षेत्रांमधील आहेत. ऊर्वरित पदे येत्या सव्वा वर्षांमध्ये भरली जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा पुढाकार
गेल्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या सर्व विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी अभियान हाती घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार सर्व विभागांनी त्यांच्यातील रिक्त पदांची सूची तयार करण्याचे कार्य हाती घेतले असून त्यानुसार पदे भरली जाणार आहेत. विशेषतः संरक्षण, गृह आणि आरोग्य विभागांमध्ये नव्या कर्मचाऱयांची सर्वाधिक भरती होईल, अशी शक्यता आहे.
बिगर सरकारी क्षेत्रातही
बिगर सरकारी क्षेत्रांमध्येही रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकार आग्रही असून तशा सूचना विविध बिगर सरकारी आणि खासगी क्षेत्रांना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथेही लवकरच या अभियानाचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात नवे रोजगार मोठय़ा प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रात आता नवे प्रकल्प निर्माण होत असून रोजगारनिर्मितीची संधी मोठी आहे, असे तज्ञांचे मत आहे.