जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे क्षीरसागर यांना आव्हान : पाच फुट लांबूनच पाया पडून घेण्याचा चंद्रकांत दादांना सल्ला
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवसेनेने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना आमदार केले. यंदा पराभूत होवूनही कॅबीनेट दर्जाचे पद दिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर मोठे झालात आज त्यांनाच सोडून गेलात. शिवसेनेशी केलेली गद्यारी शिवसैनिक कदापी खपवून घेणार नाहीत. तुमच्यावर पडलेला गद्दारीचा हा शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. पुढील काळात शिंदेगट म्हणुन कोल्हापुरातून निवडणुक लढवून दाखवा, असे थेट आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी क्षीरसागर यांना दिले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पवार म्हणाले, बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपण एकत्र आलो आहे. आजच्या मेळाव्याला जावू नका असे फोन काही शिवसैनिकांना एका ठिकाणाहून गेले. तुमचे काय प्रश्न असतील तर माझ्याकडे या मुख्यमंत्र्यांशी माझी जवळीक आहे. तुमचे प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे आमिषही दाखविण्यात आले. मात्र त्यांना शिवसैनिकांनी जुमानल नाही. कोल्हापूरचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी शिंदेगटात गेल्याचे ते सांगत आहेत. मात्र कोल्हापुरचे प्रश्न रखडले म्हणून नव्हे तर ह्यांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्याचे पवार म्हणाले. तसेच विकासाच राजकारण करणार असल्याचे ते म्हणत आहेत. मग इथूनमागेही सत्तेत होता तेंव्हा कसलं राजकारण केलात असाही प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : महाविकास आघाडीचे निर्णय रद्द करणे अव्यवहार्य- हसन मुश्रीफ
दादा पाच फुट लांबूनच पाया पडुन घ्या
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनाही क्षीरसागर यांचा स्वभाव माहिती आहे. तरीही क्षीरसागर हे स्वार्थी राजकारणी असून त्यांच्याकडून पाच फूट लांबूनच पाया पडून घ्या, असा सल्ला पवार यांनी दिला. तसेच पाया पडत पडत तुमचाच पाय कधी ओडला हे तुम्हाला कळणार नाही अशीही खोचक टिका जिल्हाप्रमुख पवार यांनी केली.
धर्मवीर सिनेमा बंडखोरीचा प्लॅन
धर्मवीर सिनेमा बंडखोरीचाच एक प्लॅन आहे. स्वगीर्य आनंद दिघे यांच्यासोबत आपण काय काम केले हे दाखवून द्यायचे होते. ठाण्यातून येणाऱया पैशांवर राज्यभरात मोफत शो दाखविण्यात आले. शिवसैनिकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेतला. त्यामुळे शिवसेना पुन्हा बळकट करण्यासाठी पुढील काळात गटप्रमुखांशी संवाद साधणार असल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.
बंडखोर गेले, शिवसैनिक शिवसेनेतच
राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांनी बंडखोरी केली. ते शिवसेनेला सोडून गेले असले तरी शिवसैनिक मात्र शिवसेनेतच आहेत. त्यामुळे जिल्हात शिवसेनेला काहीही फटका बसला नसल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवण यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : ‘भूविकास’चे कर्जदार शेतकरी, कर्मचाऱ्यांना दिलासा द्या
मतभेद बाजूला ठेवुन एकत्र लढा
सध्याची वेळ मागील काळात काय झाले हे काढत बसण्याची नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्याची ही वेळ आहे. त्यामुळे मतभेद बाजूल ठेवून एकत्र येवून लढा द्या, जिल्हय़ात शिवसेना नक्कीच पुर्वीप्रमाणे बळकट होईल, असा विश्वास माजी आमदार सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे तीनही माजी आमदार विधानसभेत
भाजपने दिलेले कोटींच्या उड्डानाने बंडखोरांनी हिंदूत्व विकले. पण ते कोणाच्या जीवावर निवडून आले हे विसरले आहेत. याच फटका त्यांना पुढील काळात बसणार आहे. शिवसेनेसोबत असलेले तीनही माजी आमदार पुढील काळात विधानसभेत नक्कीच दिसतील असा विश्वास जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला.
जुन्या शिवसैनिकांना सोबत घेणार
मेळाव्याला शिवसैनिकांची उपस्थितीही हेच बंडखोरांना उत्तर आहे. पुढील काळात जुन्या शिवसैनिकांना सोबत घेवून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शिवसैनिक भाजप, शिंदेगट शुन्यच ठेवतील असे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी सांगितले.
गेले ते पगारी पुजारी बडवे होते
महाराष्ट्रावर आजपर्यंत जी परकीय आक्रमणे झाली ती सुरत, पंढरपूर, पुणे मार्गेच झाली. मात्र ही आक्रमणे सातारा, कोल्हापुरच्या गादीने रोखली आहेत. त्याच मातीतील आपण असून शिवसेनेशी गद्दारी कधीही करणार नाही. पक्षातून गेले ते पगारी पुजारी बडवे असल्याची टीका शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली.
खासदार राऊत यांच्या उपस्थित पक्षप्रवेश
मेळाव्याप्रसंगी माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, कमलाकर जगदाळे यांच्यासह शहर व ग्रामीण परिसरातील अनेकांनी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेल्यांचा सत्कार करण्यात आला.