समस्या घेणार जाणून, अन्य अधिकारी राहणार उपस्थित
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी गावाकडे या योजनेंतर्गत महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्रामवास्तव्य करत आहेत. शनिवार दि. 21 रोजी बेळगाव तालुक्यातील अलतगा येथे ते ग्रामवास्तव्य करणार असून गावातील विविध समस्या जाणून घेणार आहेत. याबाबत गावामध्ये संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
गावामध्ये वास्तव्य केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजणे अवघड आहे. त्यासाठी सरकारने ‘अधिकारी गावाकडे’ ही योजना सुरू केली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यापूर्वी विविध तालुक्यातील गावांमध्ये वास्तव्य करून तेथील समस्या जाणून घेतल्या होत्या. त्या ठिकाणीच इतर अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याच्या सूचना करत आहेत.
शनिवारी अलतगा येथील उच्च प्राथमिक शाळेमध्ये ते वास्तव्य करणार आहेत. सकाळी 9 वाजता गावामध्ये दाखल होऊन फेरफटका मारणार आहेत. या वास्तव्यादरम्यान विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनाही त्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
योजनांचा आढावा घेणार
सरकारने ज्या योजना राबविल्या आहेत त्या योजना यशस्वी झाल्या की नाही, याचबरोबर सर्वसामान्य जनतेची जी कामे आहेत ती कामे अधिकारी करत आहेत की नाही, याची माहिती या ग्रामवास्तव्यातून घेतली जाणार आहे.
यापूर्वी अनेक गावांना भेटी देऊन त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आता अलतगा गावातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा गावकऱ्यांना लागून राहिली आहे.