वाकरे/प्रतिनिधी
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील (वय ७७ , रा.वाकरे ता. करवीर ) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा आवाज हरपला अशी भावना शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पी. जी. पाटील यांनी कॉलेज जीवनापासून संघटनात्मक कार्याला सुरुवात केली होती. सुरुवातीला जनता दलातून त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाला करायला सुरुवात केली. यशवंत बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते.
उसाला दर मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या संघटनेबरोबर त्यांनी काम केले आहे.
पी .जी पाटील यांच्यावर काही दिवसांपासून कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वाकरे गावासह कुंभी कासारी परिसरात शोककळा पसरली आहे.