‘पूर्वरंग’ नावाचं पुलंचं एक पुस्तक आहे. त्यात एक गंमतीशीर प्रसंग आहे. इंडोनेशिया, बालीच्या यात्रेवर ते असताना तिथे ‘मस्तकोवेरी’ नावाचं नाटक पहायचा योग आला. मस्तकोवेरी म्हणजे बाहूभूषण! तर त्यातली अभिनेत्री बाहुभूषणाविषयी सतत सांगत असते. ते तिचं असतं. पुलं म्हणतात ‘रूपक ईरियन बारतच्या प्रतिमेशी चपखल बसत होते.’ त्यावेळी तिथे ईरियन बारतच्या युद्धाविषयीचा भडका उडाला होता. आणि तो त्यांनी त्या नाटकातून पुढे आणला होता. पुन्हा तिथे पुलंची एक टिप्पणी आहे. ‘आपल्याकडे कसा खाडिलकरांनी कर्झन कीचकाच्या वेषात आणला!’ म्हणजे नाटक हे आपल्या सगळय़ा तत्कालीन नाटककारांनी समाजप्रबोधनाचे साधन मानले होते. हे सगळं आठवण्याचं कारण एवढंच की गळय़ाला सुरी लावलेला माणूस एकवेळ खून करेल पण मोकळेपणाने गाऊ शकत नाही. पिंजऱयात डांबलेला पक्षीही कधी गात नाही. पोपटपंची करीलही एकवेळ, पण सुरेल तान घेऊन मोकळेपणाने गाणं हे रानातल्या पाखराच्या गळय़ातूनच ऐकू येईल. स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी पर्व अगदी नुकतंच साजरं झालं. त्या पार्श्वभूमीवर मा. दीनानाथांनी आणि इतर अनेक ग्रेट गायकांनी अमर केलेलं हे गीत
दिव्य स्वातंत्र्य रवि, आत्मतेजोबले,
प्रकटता अवनीतली, कोण त्या लोपवी
आपल्याला स्वातंत्र्याची महागाथा ऐकवतं. या गीतातील शब्द अत्यंत तेजस्वी असण्याचं कारण असं आहे की वीर वामनराव जोशी यांच्या लेखणीतून जन्माला आलेले हे शब्द आहेत. तेव्हा एकेक शब्द हा स्फुEिल्लग असणारच. स्वातंत्र्य हे रविसारखं असतं. तेजस्वी असतं. त्याचं स्वरूप आणि सौंदर्य हे दाहक म्हणावं इतकं तीव्र असतं. म्हणून अर्थातच ते हाताळणारे हातही कणखर विवेकी असावे लागतात. नाहीतर चुकीच्या पद्धतीने हाताळणी झाल्यास जळून नष्ट होणं हाच त्याचा भविष्यकाळ ठरलेला असतो. शिवाय त्याचे महाभयानक परिणाम अनेकांना भोगावे लागतात. संगीत रणदुंदुभी हे नाटक याच विषयाभोवती फिरतं. जर वारसाहक्काने मिळालेली राजसत्ता टिकवता यायला हवी असेल तर तिचा वारस शूर व निर्भय असावा लागतो. नुसता राजपुत्र आहे, म्हणजे तो शौर्यवान असणारच असं काही नसतं. ‘रणदुंदुभी’ तला राजपुत्र तर मनानेच इतका गुलाम झालेला असतो की खुशाल आपलं राज्य मातंग राजाला द्यायचं ठरवतो त्यावेळी नायिकेच्या तोंडून
लोपुनिया चिरसुखदा, दिव्य शील संपदा
पापरता पामरता स्मरती नरपति शिरी अरि सदा
महाभया धरित आपदा
असे उद्गार बाहेर पडतात. म्हणजेच स्वातंत्र्य आणि निर्भयतेने लोकं जगू शकत नसतील तर अराजक माजले आहे हे समजून जावे.
जगण्यासाठी माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आधी पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतर मग त्याचा सांस्कृतिक प्रवास सुरू होतो. साहजिकच जेव्हा राज्यात किंवा राष्ट्रात अराजक माजते, लढाया होतात तेव्हा कलाकारांची अवस्था सर्वात वाईट असते. जुन्या काळी तर दोन राजेशाह्यांमधील आपसात असलेल्या वादातही अतिशय चांगले कलाकार कितीतरी वेळा भरडले गेलेले आहेत. कलाकारांचं दैवत असलेल्या संगीत सम्राट तन्ना मिश्र अर्थात मियां तानसेन यांच्या जीवनावर एक आख्यायिका सांगितली जाते. केवळ अकबराला आपल्या दरबारातील नवरत्नांत एक रत्न हवे म्हणून तानसेनाला त्याने त्याच्या आश्रयदात्याकडून जबरदस्तीने मागून घेतले. त्या राजाने ‘आपण एकवेळ माझे शीर कापून मागावे पण तानसेन मागू नये’ अशी विनंती केली असता उन्मत्तपणे ‘ठीक आहे. आपले शीरच कापून पाठवावे.’ असा निरोप धाडला आणि शेवटी तानसेनला उचलून नेलेच. बरं या सगळय़ात तानसेनचे मत कुणीच विचारले नाही. त्याची अवस्था म्हणजे त्यावेळच्या वधूसारखी झाली असणार. जिला निर्णयस्वातंत्र्यच नसे. जिथे जाऊन पडू तिथे दिवस काढायचे की झाले. सारखा प्रश्न पडत राहतो की मनाविरुद्ध एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि भरीत भर म्हणून गायचेही आहे. तेही आयुष्य किंवा सम्राटाची मर्जी संपेपर्यंत. हे असं सगळं किती वाईट! कशी राहिली? कशी गायली ती माणसं? कोंबडय़ांच्या झुंजी लावाव्यात किंवा हत्तींची साठमारी असावी तशी दोन गायकांची अक्षरशः झुंज लावली जायची आणि त्यात हरलेल्याची धिंड निघायची. अशा असंख्य कहाण्या आहेत. ज्या ख्यालगायनासाठी माणसं जिवाचा आटापिटा करतात त्याच ख्यालगायकीला तेव्हा प्रति÷ाच नव्हती. खुद्द तानसेन स्वतःला धृपदियाच म्हणवून घेत असे. संगीत या गोष्टीची प्रति÷ा स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य तरी या गायकांना होतं? पुन्हा ते गाणं ऐकायची परवानगी गरती स्त्रियांना नव्हती. मग शिकणं तर लांबच राहिलं. इतक्मया मेहनतीने आणि आयुष्य खर्च करून शिकलेल्या गाण्याला पुढे नेणारे कलावंत मात्र चंगीभंगी याच सदरात मोडायचे. हा प्रकार तर परवापर्यंत चालू होता. अजूनही काही ठिकाणी हा प्रकार आहे. स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचं? भूपाळी गायक भाट आणि दरबारगायक या दोन जागांवर वेगवेगळय़ा व्यक्ती असत. मोठी गंमत अशी की भूपाळी गाणाऱया भाटाला बंधन असे. त्याने फक्त भूपाळीच गायची. इतर राग गाण्याचं स्वातंत्र्य त्याला नसे. म्हणजे अशा कामांसाठी नेमलेल्या गायकाला जर एखादा दिवस तोडी गावासा वाटला, किंवा भैरव गायची इच्छा झाली तर? परवानगी नाही. का? तर तो भूपाळी गायक म्हणून. संस्थानिक आपल्या पदरी गायक बाळगत. वझेबुवांसारखे घराण्याचे अध्वर्यू संस्थानी राजवटीतच मोठे झाले. खरं तर गायकांना स्वातंत्र्य मिळावं यासाठीच त्यांना पदरी बाळगण्याची पद्धत होती. म्हणजे त्यांना पोटापाण्यासाठी दुसरं काही करावं लागू नये. त्यांच्या आवडीच्या कामातच ते व्हावं आणि एकचित्ताने संगीताचा अभ्यास करायला व शिष्य घडवायला त्यांना वेळ मिळावा. चांगल्या हेतूने केलेल्या गोष्टीचे साफ बारा तेव्हा वाजायचे जेव्हा असे संस्थानिक लहरी असत. कित्येकदा अशा संस्थानिकांसमोर गाताना त्यांचे लक्ष तिथे नसेच. त्यांची मर्जी फिरली तर ते मध्येच गाणे थांबवीत. मध्येच उठूनही जात. ज्या संस्थानिकांच्या पदरी ते असत त्यांची स्तुती करणारी कवने गाणे हा तर अगदी आम प्रकार होता. काही ठिकाणी कलावंतांसाठी खैरात म्हणून बदाम पिस्ते भरलेली ताटं यायची. आणि केसरबाईंसारखी तेजस्वी मंडळी अशी आयती ताटं नाकारायचीही! काहीवेळा स्त्री गायकांवर याच संस्थानिकांमुळे, आश्रयदात्यांमुळे अनवस्था प्रसंग ओढवायचे. काय काय म्हणून सांगावं? स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तेव्हाच्या कलाकारांना खराच माहीत होता. म्हणून कित्येकांनी संगीत नाटक किंवा आपल्या गाण्यातून ही देशभक्ती दाखवली. जोपासली. कलाकार म्हणून असणारं पारतंत्र्य आणि माणूस म्हणून असणारं पारतंत्र्य या दोहोंशी लढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर वीर सावरकर, वीर वामनराव जोशी यांसारख्या देशभक्तांनी कलाकारांना मोह पडावा अशा कलाकृती सादर केल्या. म्हणून तर
वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्
असं म्हणणारे कलाकार आजही लक्षात राहतात. आणि तेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरून ‘ए मेरे वतन के लोगो’ गाणाऱया आपल्या पूज्य लतादीदीही तितक्मयाच वंद्य होतात. स्वातंत्र्याशिवाय सारं काही व्यर्थ आहे हे मोकळय़ा मनाने आणि मोकळय़ा गळय़ाने गाणाऱयांना आणि वाजवणाऱयांना नक्कीच विचारावं. ते म्हणतील,
शौर्यसागरलहरी गगनमंडल महा
भेदिता कवण त्या अबल कर थोपवा
दिव्य स्वातंत्र्य रवि.
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभु