पंतप्रधानांची कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिवाळीनिमित्त जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कारगिलला (Kargil) पोहचले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तसेत मोदींनी जवानांना संबोधित केले. वर्षानुवर्षे माझ्यासाठी तुम्ही सर्व माझे कुटुंबीय आहेत. माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यामध्ये वाढतो, माझ्या दीपावलीचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे जे पुढील दिवाळीपर्यंत माझे स्थान वाढवते. दरम्यान, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याबद्दल बोलताना आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मात्र शांती ही सामर्थ्याशिवाय शक्य होत नाही. कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्य त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, पाकिस्तानसोबतचे एकही युद्ध असे झाले नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकवला नाही. दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवणारा उत्सव. कारगिलनेही तेच केले. एखाद राष्ट्र अमर असते जेव्हा तिची मुलं, तिचे शूर पुत्र आणि मुलांचा त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असतो.
आपल्यासाठी युद्ध हा कधीच पहिला पर्याय नाही. आपल्या वीरतेमुळे, संस्कारामुळे आपण युद्धाला नेहमीच शेटचा पर्याय समजलेले आहे. लंका किंवा कुरुक्षेत्र असो, येथे आपण नेहमीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण विश्वशांतीचे पुरस्कर्ते आहोत. आपण युद्धविरोधी आहोत. मात्र शांततेसाठीही सामर्थ्य लागते. आपल्या सैनिकांकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे. कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या तिन्ही दलाचे सैन्य उत्तर देण्यास समर्थ आहे. शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तद देण्यास आपले सैन्य समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
तुमच्या (सैनिक) शौर्यासमोर आकाशदेखील झुकतो. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतिक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. तुम्ही (सैनिक) सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते, अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासने ओतप्रोत असते तेव्हाच देश सुरक्षित असतो. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांची स्तुती केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी याआधी अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी रामजन्मभूमी मंदिरात प्रार्थना केली. तसेच दीपोत्सव कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी ट्विट करून लिहिले की, प्रकाशाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.