स्वतंत्र देशाची मागणी हे पक्षाचे धोरण नाही
वृत्तसंस्था/ चेन्नई
स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीवरून दमुक नेते ए. राजा यांच्या विधानानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने तामिळनाडूला पूर्ण स्वायत्तता प्रदान करावी, अन्यथा तमिळ राष्ट्राची मागणी आम्ही करू असे राजा यांनी म्हटले होते. राजा यांच्या या विधानावर द्रमुक खासदार टीकेएस एलंगोवन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्वतंत्र देशाची मागणी करणे द्रमुकचे धोरण कधीच राहिलेले नसल्याचे एलंगोवन यांनी नमूद केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री राजा यांनी हताशेपोटी ही टिप्पणी केली आहे. स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणे द्रमुकचे धोरण नाही. याऐवजी राज्यांना आणखी अधिकार देण्यात यावेत. केंद्र सरकार आम्हाला अधिकार देत नसल्यानेच ए. राजा यांनी हे विधान केले आहे. जीएसटीच्या माध्यमातून केंद्राने कर आकारणीचे अधिकार काढून घेतले असल्याचे एलंगोवन म्हणाले.
नमक्कल येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात ए. राजा यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. तामिळनाडूला स्वायत्तता प्रदान करावी, अन्यथा स्वतंत्र तमिळ राष्ट्राची मागणी करावी लागेल. तामिळनाडूला पूर्ण स्वायत्तता मिळत नाही तोवर आमची लढाई सुरूच राहणार असल्याचे ए. राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून म्हटले होते.