प्रतिनिधी / बेळगाव
जीवनविद्या मिशनच्यावतीने 54 वा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा नुकताच संभाजी उद्यान, महाद्वार रोड येथे पार पडला. यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रबोधन केले. ज्ञानेश्वर माउली सोहळा आणि या विषयीची प्रत्येक कृती राष्ट्रहिताची विश्वशांती कशी असते, हे त्यांनी विशद केले.
कर्मयोग म्हणजे कर्माचे बंध आणि कर्मफळांचा आस्वाद दोन्ही टाकून देऊन कर्म करणे होय. सर्वसाधारणत: आपण मी, माझा, मलाच यात अडकलो आहोत. यालाच कर्मबंध असे म्हणतात. कर्म केले की फळ हे मिळणारच. त्यासाठी कर्म हे स्वत:च्या हिताचे आहे का, हे पाहणेही आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी विलास परब, सचिन काळे, शाखेचे पदाधिकारी व खानापूर, गोवा, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील नामधारक उपस्थित होते.