मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेंगळूर
वीर सावरकर, टिपू सुलतान यांच्याबद्दल समर्थन-विरोधी समजुती आहेत. हे ऐतिहासिक मुद्दे असून त्यांच्या बाजूने आणि विरुद्ध युक्तिवादही आहेत. तर्कशुद्धता असेल तर ती तर्कशुद्ध विचारानेच मांडली पाहिजे. तसेच तर्कशुद्ध पद्धतीनेच विरोध केला पाहिजे. अशी प्रकरणे रस्त्यावर आणून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणू नये, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले. रविवारी हावेरी जिल्हय़ाच्या दौऱयावर जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, श्रीमती इंदिरा गांधींनीही वीर सावरकर यांना देशाचे सर्वश्रेष्ठ सुपुत्र म्हटले होते. लोकशाहीच्या पद्धतीने आपण कुठपर्यंत युक्तिवाद करायचा हे ठरविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून हे लक्षात आल्यास मतभेद असतानाही आपण काम करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या कारवर अंडी फेकल्याच्या प्रकरणाबाबत बोलताना, कोणतीही घटना घडल्यास त्या घटनेची कायदेशीररित्या चौकशी केली जात आहे. विरोधी पक्षनेत्यांना संरक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणात राजकारण करावे की नाही याचा निर्णय त्या-त्या पक्षांनी घ्यावा. शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे, असेही बोम्माई यांनी स्पष्ट केले.