प्रसिद्ध प्राणी-पक्षीतज्ञ, वॉईल्ड लाईफ फोटोग्राफर निरंजन संत यांचे मत : गोंधळ-गोंगाटामुळे बिबटय़ा बिथरण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
मानवी वसतीमध्ये शिरलेल्या बिबटय़ाला अत्यंत चतुराईने पकडून परत नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजेच जंगलात सोडणे आवश्यक आहे. त्याला पकडण्यासाठी भूल देणे ठिक आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत बिबटय़ाला मारले जावू नये. जोपर्यंत आपण एखाद्या प्राण्याला डिवचत नाही, निष्कारण त्रास देत नाही तोपर्यंत ते आपल्याला त्रास देत नाहीत, हे ही लक्षात घ्यायला हवे. गोंधळ, गडबड, गोंगाट आणि प्रचंड फौजफाटा यामुळे बिबटा अधिकच बिथरण्याची शक्मयता लक्षात घ्यायला हवी, असे मत प्रसिद्ध प्राणी व पक्षीतज्ञ तसेच वॉईल्ड लाईफ फोटोग्राफर निरंजन संत यांनी व्यक्त केले.
बिबटय़ाचा बेळगावमध्ये मानवी अधिवासात प्रवेश, त्यानंतर भयभीत झालेले नागरिक, वनखात्याचे व पोलिसांचे बिबटय़ाला पकडण्यासाठीचे प्रयत्न आणि त्यांना आलेले अपयश याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त केले.
संत म्हणाले, बिबटय़ा आकारमानाने वाघापेक्षा अत्यंत लहान असतो. परंतु प्रचंड चपळ आहे. वास्तविक हे अत्यंत शांत असे जनावर आहे. खरेतर त्याचा माणसांना फारसा धोका नसतो. कारण मुंबईच्या पार्किंग एरियामध्येसुद्धा बिबटे अत्यंत सहजपणे कोणालाही उपद्रव न करता फिरत असतात. फक्त कोणत्याही वन्यप्राण्याबद्दल आपल्या मनात भीती असते. त्यामुळे आपणच अनेक तर्क-वितर्क लढवत असतो.
बिबटय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे तो झाडात लपून राहतो, तसेच तो झाडाच्या टोकावरही दीर्घकाळ बसू शकतो. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणे, उपद्रव न करणे किंवा त्याला न डिवचणे एवढी काळजी आपण घेतल्यास तो शांतपणाने परत जाऊ शकेल. परंतु जर आपल्या डिवचण्याने, आवाजाच्या गोंगाटाने तो बिथरला आणि एखाद्या अपार्टमेंटमध्ये किंवा मानवी वसाहतीत घुसला तर मात्र गंभीर परिस्थिती ओढवू शकते, असेही ते म्हणाले.
या बिबटय़ाला पिंजऱयातच पकडायला हवे. पिंजऱयामध्ये कुत्रे ठेवायला हवे. जेणेकरून कुत्रे रात्रभर ओरडत राहील आणि त्याच्या आवाजाला व वासाला बिबटय़ा पिंजऱयाकडे येवू शकतो. शेळी मध्यरात्रीनंतर झोपून जाते. त्यामुळे शेळी बांधणे उपयुक्त होणार नाही, असेही निरंजन यांनी नमूद केले.
सतत डिवचल्यास धोकादायक
बिबटय़ा इतका चपळ आहे की तो गटारीत जाऊन लपला तर आपल्याला कळणारसुद्धा नाही. 14 ट्रप कॅमेरे, 6 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेरे, 300 जणांचा ताफा व 2 हत्ती इतके सर्व असून सुद्धा तो गुंगारा देतो आहे, यावरून त्याची चपळाई ओळखायला हवी. सध्या तो रेसकोर्स परिसरात आहे. येथे असणारे मोर आणि भटकी कुत्री याचा त्याला निश्चितच वास लागला आहे. त्यामुळे त्याला न डिवचता अत्यंत कुशलपणे आणि चतुराईने सापळय़ात घ्यायला हवे. वनखात्याकडे तसे तज्ञ असतात. त्यामुळे काळजीचे कारण नाही. आपण सतत त्याला डिवचल्यास तो मानवी वसतीत थेट शिरकाव करू शकतो. याचे भान मोहिमेतील सर्वांनीच बाळगायला हवे, याकडे संत यांनी लक्ष वेधले.
हत्तींचा वापर बिबटय़ाला भूल देणाऱया इंजेक्शनसाठी केला जातो. हत्तीवरील व्यक्ती भूल देऊ शकते. इंजेक्शन दिल्यानंतर साधारण 50 मिनिटे तो बेशुद्धावस्थेत राहू शकतो. मात्र ठराविक वेळेनंतर त्याला शुद्ध येण्यासाठी पुन्हा वेगळे इंजेक्शन देण्याची गरज असते. कोणत्याही परिस्थितीत बिबटय़ाला जीवानिशी मारता कामा नये. वन्यप्राण्याला मारणे हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे मानवी समुहाला प्रचंड उपद्रव होत असल्यास तसा विचार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करावा लागतो. सध्या तरी बिबटय़ाच्या बाबतीत तशी गरज नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.