सिंगापूरच्या सरकारने एक अनोखा प्रकल्प हाती घेतला आहे. मूत्राचे प्रमाण अधिक असलेल्या सांडपाण्यापासून चक्क पिण्याची बियर तयार करण्याची ही योजना आहे. तेथील एका स्थानिक कंपनीने हा प्रयोग यशस्वी करून दाखविला असून या बियरचे नाव ‘न्युब्रू’ असे ठेवले आहे. ही जगातील सर्वाधिक पर्यावरणस्नेही बियर असल्याचे तज्ञांचे मत आहे. 20 वर्षे प्रयोग करून हे यश मिळविण्यात आले आहे. ही बियर तयार करताना मूत्रमिश्रीत सांडपाण्यावर अशाप्रकारे प्रक्रिया करण्यात येते, की ही बियर कशाची बनली आहे, याचा सुगावाही लागत नाही. या बियरची लोकप्रियताही आता वाढू लागली आहे.
बियर बनविण्यासाठी फळांचा रस इत्यादी चांगल्या प्रकारचा कच्चामाल उपलब्ध असताना मूत्रमिश्रीत सांडपाणीच का वापरण्यात आले, या प्रश्नाचे पटण्यासारखे उत्तरही या कंपनीजवळ आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार येत्या 20-25 वर्षांतच पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होणार आहे. अशावेळी पाण्याची नासाडी करणे हा गुन्हा ठरण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुनउ&पयोग होणे ही काळाची गरज ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच त्याची तयारी आम्ही करत आहोत. शरीरातून जे पाणी बाहेर सोडले जाते, तेच पुन्हा पिण्यायोग्य करून त्याचे प्राशन करण्यात काहीही गैर नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे. या बियरला मिळणारा प्रतिसाद पाहता आमची ही संकल्पना यशस्वी झाली आहे, असे प्रतिपादन व्यवस्थापनाने केले आहे.
आपल्या भारतीय मनाला मात्र मूत्रमिश्रीत पाण्यापासून तयार केलेली ही बियर कितपत भावेल, हा सध्यातरी प्रश्न आहे. तथापि, भारतालाही पाणीटंचाईचा सामना करावाच लागत आहे. त्यामुळे कालांतराने ही बियरसुद्धा भारतीय लोकांच्या जिभेवर रुळेल, असे मानावयास हरकत नाही.