आयआयटी प्रश्नावर राखी प्रभुदेसाई नाईक यांनी व्यक्त केलेले मत
प्रतिनिधी / सांगे
राज्य सरकारने सांगेमधील शांतताप्रिय लोकांमध्ये नियोजित जमिनीतच आयआयटी उभारण्याचा अट्टहास धरून तेढ निर्माण करू नये, असे आवाहन तृणमूलच्या राखी नाईक प्रभुदेसाई यांनी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. हा कॅम्पस कार्यान्वित झाल्यानंतर सांगे तालुक्याला कोणत्या प्रकारचे फायदे मिळतील याबद्दल राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
नियोजित प्रकल्प स्थळावरील लोकांनी त्यांच्या जमिनीबद्दल बोलताना जे सांगितले आहे त्याप्रमाणे त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. या प्रकल्पासाठी शक्यतो शेतजमीन किंवा लागवडीस योग्य जमीन संपादित करू नये. या संकुलामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना त्रास होता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. या भागातील काही राजकारणी हा प्रकल्प ‘बुलडोझ’ करण्याच्या बाजूने झुकत आहेत. आम्हाला सत्तरीची पुनरावृत्ती सांगेमध्ये करायची नाही, असेही नाईक म्हणाल्या.
सांगेमधील लोकांवर जबरदस्ती न करता हा प्रकल्प राबविता येईल अशा अनेक जमिनी उपलब्ध आहेत हे राज्य सरकारने समजून घेतले पाहिज. या प्रकल्पामुळे निर्माण होणार असलेल्या रोजगाराच्या संधी आणि स्थानिकांसाठी कोणत्या प्रकारच्या नोकऱया उपलब्ध होतील याचीही सविस्तर माहिती आकडेवारीसह जाणून घेण्याची लोकांची इच्छा आहे, याकडे नाईक यानी लक्ष वेधले.
पंतप्रधान, राज्यपालांना पत्रे लिहिणार
राजकीय हस्तक्षेप नसता, तर रविवारी दोन गटांमधील संघर्षाची घटना टाळता आली असती, असा दावा त्यांनी केला. सांगेतील लोक सामंजस्याने जगण्यावर विश्वास ठेवतात. कोणीही अनावश्यक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो सहन करता कामा नये, असे त्यांनी सांगितले. आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना पत्रे लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत, असे नाईक यांनी स्पष्ट केले.