आमदार डॉ. देविया राणे यांचे आवाहन
पणजी : राज्यात दरवर्षी सुमारे 33 लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. परंतु शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आधारभूत किंमतीचा काहीच फायदा होत नाही. त्याशिवाय पशुवैद्यकीय इस्पितळांमध्ये योग्य सुविधा नसल्यामुळे शेजारील राज्यांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांना खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. सध्या त्यांना जे 40 टक्के मानधन देण्यात येते, त्यात किमान 60 टक्क्यांपर्यंत तरी वाढ करावी, तसेच ते मानधन सहा सहा महिने मिळत नाही. ते दरमहा नियमित देण्यात यावे अशी मागणी आमदार देविया राणे यांनी केली. शुन्य प्रहरात त्या बोलत होत्या. हे चित्र असेच राहिल्यास त्यांना व्यवसाय बंद करावा लागणार, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यावर बोलताना मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शेतकऱ्यांना अटोमेटिक मिल्किंग यंत्र घ्यावे, असे खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. परंतु त्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वरील परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी सदर यंत्र घेण्यासाठी पुढाकार घेतल्यास सर्वकाही सुस्थितीत येईल, असे सांगितले. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी गेल्या सुमारे 10 वर्षांपासून आपल्या मतदारसंघातील लोक लाटंबार्से औद्योगिक वसाहत सुरू होण्याची वाट पाहात आहेत. तेथे काहीतरी रोजगार मिळतील अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. परंतु सरकारी पातळीवर दिसून येणारी अनास्था या लोकांच्या निराशेचे कारण बनत आहे. त्यामुळे सदर वसाहत शक्य तेवढ्या लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे, अशी मागणी केली. त्यावर बोलताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी आपल्या मतदारसंघात सतावणाऱ्या पाणी समस्येवरून तेथील लोकांचे होणारे हाल सभागृहाच्या नजरेस आणून दिले. या भागातील लोकांच्या हक्काचे पाणी तेथे येणाऱ्या मोप विमानतळासह अन्य बडे औद्योगिक प्रकल्प आणि बांधकामांसाठी वळविण्यात येत असल्याने लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तब्बल 10-10 दिवस लोकांना पाणीच मिळत नाही. संपूर्ण मतदारसंघात केवळ एकच टँकर पाणी पुरवठा करत असल्याने कुणालाच धड पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन लोक आपणाजवळ येत असल्याची कैफीयत त्यांनी मांडली. त्यावर बोलताना मंत्री नीलेश काब्राल यांनी कोणत्याही प्रकल्पासाठी पिण्याचे पाणी वळविण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले. आमदार सांगतात त्या प्रकल्पांना कच्चे पाणी पुरविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पेडणेत 4 एमएलडी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे. ही समस्या शक्य तेवढ्या लवकर सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. क्रूझ सिल्वा, केदार नाईक यांनीही आपापल्या मतदारसंघातील समस्या सभागृहाच्या नजरेस आणून दिल्या.