महामोर्चात मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार : उचगावात म. ए. समितीची जनजागृती बैठक
वार्ताहर /उचगाव
राष्ट्रीय पक्षाच्या कोणत्याही आमिषाला मराठी भाषिक जनता कधीही बळी पडणार नाही. मराठय़ांना संपवायचा कोणीही प्रयत्न करू नका, मराठी माणूस हा आपली संस्कृती आणि आपला धर्म सांभाळून काम करणारा एकमेव समाज आहे. मात्र याच समाजावर आज राष्ट्रीय पक्ष मोठे झालेले आहेत. कोणतीही आमिषे दाखवून जर तुम्ही मराठय़ांना संपविण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी तुमचा खड्डा खणायला मराठी समाज कधीही मागे पडणार नाही. तुम्ही जरी समाजाला आमिषे दाखवून बदलण्याचा प्रयत्न केला तरी वेळ आल्यानंतर तुमची योग्य जागा दाखवायला हा समाज कधी मागे-पुढे पाहणार नाही. म. ए. समितीने सीमाप्रश्न आणि मराठी भाषेसाठी चालविलेला हा लढा आहे. गेली 65 वर्षे हा लढा अखंडपणे चालवणारी भारतातील एकमेव संघटना असल्याचे प्रतिपादन उचगाव येथील लॅण्ड ट्रिब्युनल सदस्य बाळासाहेब देसाई यांनी व्यक्त केले.
येथील मध्यवर्ती गणेश मंदिरात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
दि. 27 जून रोजी म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून मराठी भाषेत आम्हाला परिपत्रके द्यावीत, अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी उचगाव येथील गणेश मंदिरात जनजागृती मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे ज्ये÷ नेते बी. एस. होनगेकर होते. व्यासपीठावर मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, एम. जे. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा नेते आर. एम. चौगुले, आंबेवाडी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी युवा नेते आर. एम. चौगुले म्हणाले, आपण मराठी संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. काही विघ्नसंतोषांकडून मराठी भाषिकांत असंतोष माजविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मराठी माणूस वेळ आल्यावर त्यांची जागा दाखवून देणार आहे. त्यासाठी येत्या 27 जूनच्या मोर्चामध्ये सर्वांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन
केले. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, मराठा एकत्र आला तर काय करू शकतो हे आज दाखविण्याची वेळ आलेली आहे. सीमाप्रश्नासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ न देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देऊ. यावेळी संतोष मंडलिक, शिवाजी सुंठकर, शिवाजी खांडेकर, एम. जे. पाटील आणि बी. एस. होनगेकर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन एल. वाय. लाळगे यांनी केले. पुंडलिक पावशे यांनी आभार मानले. यावेळी उचगाव परिसरातील समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.