काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचे आवाहन, सावर्डे पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद
प्रतिनिधी /कुडचडे
आज राज्यात सामान्य जनतेची स्थिती कोणत्या स्तरावर पोहोचली आहे ती प्रत्येकाच्या समोर आहे. तरीही भाजप सरकार गरिबांना गरीब ठेवण्यातच समाधानी दिसून येत आहे. हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करणार असे दावे करत होता. पण गोव्यातील अंदाजे 62 टक्के जनतेने त्यांच्या विरोधात मतदान करून गेली दहा वर्षे राज्य करणाऱया भाजपला जागा दाखवलेली आहे. जनतेने भाजप सरकारच्या निवडणुकीपुरत्या देखाव्यासाठी आणलेल्या व दिशाभूल करणाऱया योजनांना भुलू नये, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर पाटकर यांच्याकडून राज्यातील विविध मतदारसंघांत जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण सुरू आहे. याअंतर्गत नुकतीच त्यांनी सावर्डे मतदारसंघातील सावर्डे पंचायत परिसरातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा, उपाध्यक्ष एम. के. शेख, सचिव मोरेनो रिबेलो, सरचिटणीस एवर्सन वालेस, सावर्डे गटाध्यक्ष राजू शिरोडकर, सावर्डे युवक काँग्रेस अध्यक्ष संकेत भंडारी, दक्षिण गोवा सचिव श्याम भंडारी, जयेश पाटील यांची उपस्थिती होती.
भाजप सरकारने काँग्रेस पक्षावर आरोप करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सामान्य जनता काँग्रेसबरोबरच राहणार यात शंका नाही. सामान्य जनतेला सताविणाऱया अडचणींना दूर करण्यासाठी आपण सर्व काँग्रेसजनांनी एकत्र होऊन प्रयत्न करायला पाहिजेत. तरच आपल्याला व आपल्या पुढील पिढीला समाधानात राहण्यास मिळण्याची स्वप्ने बघता येतील. आज महागाई वाढत चालली आहे. त्यावर सरकार उपाययोजना करत नसून नवीन योजना राबवून सामान्य जनतेची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.
आज ज्या प्रकारे भाजप सरकार लोकांची दिशाभूल करत आहे त्यासंबंधी लोकांना सांगण्याची गरज आहे. आपण एकजुटीने हे कार्य केले पाहिजे. ज्यावेळेस काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी सामान्य जनतेला अडचणी सांगण्यासाठी रस्त्यावर येण्याची गरज भासत नव्हती. पण या भाजप सरकारने सध्या सर्वांनाच रस्त्यावर आणले आहे, असे उद्गार सावियो डिसिल्वा यांनी काढले. सुरुवातीला गौतम भंडारी यांनी प्रदेशाध्यक्ष पाटकर यांना पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत केले. सदर बैठकीस काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थिती लावली होती.