गुवाहाटी / वृत्तसंस्था
गाय ही हिदूंसाठी पवित्र आहे. मुस्लिमांनी हिंदूंच्या या भावनेचा आदर राखला पाहिजे. त्यामुळे त्यांनी गोहत्या करु नये, असे आवाहन आसामचे मुस्लीम धर्मगुरु आणि जमियत उलेमाचे प्रदेश अध्यक्ष मौलाना बद्रुद्दिन अजमल यांनी मुस्लिमांना केले आहे. हिंदू संघटनांनी तसेच मान्यवरांनी याचे स्वागत केले आहे.
भारत हा भिन्न भिन्न विचारधारा असणाऱयांचा देश आहे. हिंदूंची या देशात बहुसंख्या आहे. त्यांच्या भावनांना हानी पोहचेल असे वर्तन मुस्लीमांनी केल्यास ते हितावह होणार नाही. ईद किंवा अन्य मुस्लीम सणांच्या वेळी गायीची कुर्बानी देण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी ऊंट, बकरी, शेळी इत्यादी प्राण्यांचा विचार होऊ शकतो. गायीची कुर्बानी मुस्लिमांनी टाळावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बदुद्दिन अजमल हे प्रादेशिक राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावर बांगला देशातून मुस्लीमांना बेकायदा भारतात आणून आसाममध्ये यांची वस्ती घडवून आणण्याचे आरोप आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ऑल इंडिया युनायडेट डेमेक्रेटिक प्रंट या पक्षाला 13 जागा मिळाल्या होत्या. कट्टर मुस्लीम नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी गोहत्या करुन नका असे केलेले आवाहन त्यामुळे फारच महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.