झपाटय़ाने होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱहासासंबंधी समाजाचे प्रबोधन करण्याच्या प्रयत्न करणाऱया एका निर्धारी युवकाची ही बोधप्रद गोष्ट आहे. हा युवक तोंडावर मास्क आणि पाठीला प्रतिकात्मक ऑक्सिजन सिलिंडर लावून समाजात वावरतो आणि लोकांचे पर्यावयण संरक्षण आणि संवर्धानासंबंधी प्रबोधन करतो. या युवकाचे नाव अतुल मिश्रा असून तो प्रयागराज येथील आहे.
असे तो का करतो ? याचे कारण असे की आज बऱयाचदा आपण पिण्याचे बाटलीबंद पाणी विकत घेऊन ते पितो. प्रत्येक स्थानी स्वच्छ नळाचे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे असे करावे लागते. पण आज जशी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, तशी नजीकच्या भविष्यकाळात ऑक्सिजनची होऊ शकते. त्यावेळी आपल्याला असा ऑक्सिजन विकत घेऊन जगावे लागेल. त्यामुळे आजच जागे व्हा. पर्यावरण्याच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी स्वतःला झोकून द्या. अन्यथा भविष्यकाळात जगणेही अशक्य होईल, हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या युवकाने ही शक्कल लढविली आहे.
त्याच्या या उपक्रमाचे लोक कौतुक करतात. तथापि, माझी स्तुती करु नका. त्याची काहीही आवश्यकता नाही. मात्र, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणा. सध्याची निसर्गाचे शोषण करणारी जीवनशैली सोडून पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा स्वीकार करा. असे त्याचे लोकांना आग्रहाचे आवाहन असते. आताच आपण जागे झालो नाही, तर पुढचा आपला आणि भावी पिढय़ांचाही काळ कठीण आहे. माझ्या कृतीचा अर्थ समजून घ्या आणि आतापासूनच कामाला लागा, असे त्याचे आवाहन आहे. त्याच्या उदाहरणावरुन अनेक जण पर्यावरणासंबंधी जागरुक झालेले आहेत.