अन्यथा मुलांना खासगी शाळेत पाठवू : अडवई येथील पालक शिक्षक संघाचा इशारा
प्रतिनिधी /वाळपई
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या शिफारशीनुसार भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई येथील प्राथमिक शाळा डोंगरवाडा वांते येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. आमच्या सर्व मुलांना आम्ही खासगी शाळेत दाखल करू, असा इशारा अडवई येथील पालकांनी दिला आहे.
पालक शिक्षक संघाची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये सरकारच्या विद्यालयाच्या स्थलांतराबाबत सविस्तर चर्चा करून तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुमेधा देसाई समितीच्या संगीता गावकर, विभा राणे, अमोल गावकर, प्रियंका गावकर, राधाबाई देसाई, युवराज देसाई, सखाराम देसाई अभिषेक देसाई व इतर पालकांची उपस्थिती होती.यासंदर्भात लवकरच भागशिक्षणाधिकाऱयांना निवेदन सादर करून आपला विरोध दर्शविण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून याठिकाणी चांगल्या प्रकारे शाळा चालत आहेत. या विद्यालयांमध्ये 21 मुले शिक्षण घेत आहे. नीती आयोगाच्या शिफारशीनुसार 15 पेक्षा कमी असलेल्या शाळांचे स्थलांतर करणार असल्याचे सरकारने घोषित केलेले आहे. मात्र या शाळेमध्ये 21 मुले असताना त्यांचे स्थलांतर का केले जाणार आहे? असा सवाल पा. शि. संघाच्या अध्यक्ष सुमेधा देसाई यांनी केला आहे.
आडवई येथील प्राथमिक शाळा 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरवाडा वांते प्राथमिक शाळेत करण्यात येणार आहे. यामुळे पालकांना व मुलांना विविध समास्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे सदर शाळेचे स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशी विनंती सुमेधा देसाई यांनी केली आहे.
दोन दिवसात भागशिक्षणाधिकाऱयांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करून आपला विरोध दर्शविण्यात येणार असल्याचे पालकांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
गोवा मुख्यमंत्री राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी सत्तरी तालुक्मयाच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सरकारी प्राथमिक मराठी शाळा सुरू केल्या. आज या शाळा सरकार बंद करून ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रक्रिया नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पालकाने केला असून सरकारने या संदर्भात गांभीर्याने विचार करावा अशा प्रकारची विनंती पालक शिक्षक संघाने केली आहे.