प्रतिनिधी/ पणजी
शेतकऱयांच्या पोटावर पाय ठेऊन आयआयटी प्रकल्प उभारू नका. आयआयटीच्या नावाखाली शेतकऱयांची लाखो चौरस मीटर जमीन घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सांगे तालुक्यातील कोठार्ली नुवे भागातील शेतकऱयांनी केला आहे. सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रद्द करून अन्यत्र हलवा. आयआयटीला आमचा विरोध नाही, मात्र शेती, बागायती आणि डोंगरावरील महत्त्वाची झाडे नष्ट करून असे प्रकल्प उभारू नका, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
सांगे परिसरातील आयआयटीला विरोध करणाऱया शेतकऱयांनी येथील आझाद मैदानावर काल मंगळवारी धरणे आंदोलन केले. कॉन्स्तानिसीयो मास्कारेन्हस, मारिया क्रूझ, सान्तान रॉड्रिग्स यांच्यासह सुमारे 25 शेतकरी यावेळी उपस्थित होते.
सांगे येथील ज्या जागेत सरकार आयआयटी प्रकल्प उभारण्याचा विचार करीत आहे, त्या जागेत आमच्याही जमिनी आहेत. त्या सुपीक जमिनी असून दरवर्षी शेती पिकविली जाते. अधिकाधिक शेतकरी त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतजमीन गेल्यास शेतकऱयांवर उपासमाराची पाळी येईल.
… तर गोव्याचा नाश होणार
अगोदरच अर्ध्याहून अधिक गोवा बिल्डरांनी हडप केला आहे. काही प्रमाणात राहिलेली शेतजमीन अशा प्रकल्पासाठी गेल्यास गोव्याचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. मग आमच्या पुढील पिढीला काय उत्तर देणार, असा प्रश्न शेतकऱयांनी उपस्थित केला आहे.
आमदार-मंत्री सुभाष फळदेसाई यांचा दावा खोटा
सरकार विविध मार्गाने शेतकऱयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्याठिकाणी शेती नसल्याचा खोटा दावा स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई करीत आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही शेती करीत असून जमिनी आमच्या आहेत, पुरावे पाहिजे असल्यास आम्ही ते सादर करू, असेही शेतकऱयांनी सांगितले.
युवक शेती करणार तरी कुठे?
एकाबाजूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात की, युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय करावा. शेतजमिनीच राहिल्या नाही तर युवक शेती कुठे करणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे. मंत्री सुभाष फळदेसाई यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना खरे वाटत असेल तर त्यांनी सांगेत यावे, शेती कुठे केली जाते आणि ती कुठे आहे ते आम्ही दाखवितो असेही शेतकरी म्हणाले.
सांगेतील शेतजमिनीत प्रकल्प झाल्यास आमच्या मुलांचे भविष्य संपणार आहे. सरकारी नोकऱया तर मिळणारच नाहीत, मात्र बिल्डरांना रान मोकळे मिळेल आणि आमची मुले रस्त्यावर येतील, असे शेतकऱयांनी सांगितले.