पुणे / प्रतिनिधी :
मी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी तुमची इच्छा आहे का? मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी येथे केला.
पुण्यात ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून फडणवीस यांनी पुण्यातून लोकसभा लढावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत विचारले असता मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का? मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. या फक्त माध्यमातील चर्चा आहे. तुम्ही का मला पुण्यातून लोकसभा लढवण्याबाबत बोलता, असा सवाल त्यांनी केला.
पुण्याचा पालकमंत्री कोण होणार, याबाबतही सध्या जोरदार चर्चा रंगत असून, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पुण्याचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, असे बोलले जात आहे. त्याबाबत छेडले असता मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, असे जाहीर करीत फडणवीस यांनी याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
अशोक चव्हाणांसोबत भेट नाही
शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, काँग्रेसच्या मंत्र्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. तसेच, अशोक चव्हाण आणि माझी भेट झालेली नाही. आम्ही गणपतीनिमित्त एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वादाचे विषय नकोत
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पुणे शहराचे विभाजन करून दोन महापालिका करण्याची आवश्यकता आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. मात्र, फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली. शहराचे विभाजन होणार, हा नवा वाद कशाला, जेव्हाचे तेव्हा पाहू. सध्या सरकारकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, भविष्यात तसा प्रस्ताव येऊ शकतो. तो आल्यास पाहू. मुंबईची तिसरी महापालिका करण्याचाही विचार नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. राज्याला विकासाकडे न्यायचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.