मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, पुणे शहरांच्या तिकीट दरात वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीच्या सणासाठी गावी परतणाऱया प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. खासगी ट्रव्हल्स चालकांनी दुपटीने तिकीट दर वाढविल्याने प्रवाशांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. 20 ते 22 ऑक्टोबरदरम्यान तिकिटांचे दर भरमसाट वाढविल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, पुणे या शहरांतून बेळगावमध्ये येणाऱया प्रवाशांना वाढीव दराचा फटका बसत आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे साध्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचे संकट काहीसे दूर झाल्यानंतर पुन्हा जल्लोषात दिवाळी साजरी करण्यासाठी मोठय़ा महानगरांमध्ये असणारे नोकरदार, व्यावसायिक गावी परतत आहेत. यावषी साप्ताहिक सुटय़ा दिवाळी सुटीला जोडून आल्यामुळे गावी येण्याचा अनेकांनी प्लॅन केला. परंतु रेल्वेचे बुकींग फुल्ल व बसलाही तुफान गर्दी यामुळे दुप्पट तिकीट दर देऊन खासगी ट्रव्हल्सचा प्रवास करावा लागत आहे.
खासगी ट्रव्हल्स चालकांकडून दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, ओणम यासह विकेंडला तिकीट दरात दुपटीने वाढ केली जाते. यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट होते. परंतु कोणत्याच विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विशेषतः मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद या महानगरांमध्ये जाण्यासाठी अथवा येण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत. सर्वसामान्य कुटुंबांसाठी दर परवडणारे नसल्याने दिवाळीसाठी गावी न गेलेले बरे, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे
ठिकाण | सध्याचे तिकीट दर | आधीचे तिकीट दर |
मुंबई-बेळगाव | 2500 ते 3500 रुपये | 1000 ते 2000 रुपये |
बेंगळूर-बेळगाव | 2000 ते 3000 रुपये | 1000 ते 1500 रुपये |
हैदराबाद-बेळगाव | 2000 ते 3500 रुपये | 1500 ते 2500 रुपये |
पुणे-बेळगाव | 1500 ते 2500 रुपये | 700 ते 1500 रुपये |