त्यांच्यामुळेच देशाच्या सर्वोच्च पदावर
वृत्तसंस्था/ लखनौ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत सोहळय़ात सामील झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर स्थापन या विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळय़ात सामील होण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी आनंददायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी देवासमान आहेत. त्यांच्या कार्यामुळेच मी राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचली असल्याचे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत.
आंबेडकर यांचे कार्य हे अत्यंत उल्लेखनीय हेते. अनेक आव्हानांवर मात करत त्यांनी देशविदेशात शिक्षण घेतले होते. स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि देशाचे पहिले कायदा मंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन मूल्ये आणि तत्त्वांवर आधारित होते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळवत विद्यार्थी कठिणातील कठिण लक्ष्यही प्राप्त करू शकतो असे मुर्मू यांनी नमूद केले आहे. उत्तरप्रदेशात गुंतवणुकदारांच्या परिषदेमुळे अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या अनुकूल वातावरणासाठी आमच्या शिक्षणसंसथांना जोडण्याची वेळ आली आहे. नवनवे संशोधन करत स्टार्टअपसाठी इन्क्यूबेशन सेंटर तयार करण्यात यावे. भारत जगातील तिसऱया क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्टअप ईको सिस्टीम असणारा देश आहे. या ईको सिस्टीमचा लाभ घेत विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवोन्मेषासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे.