अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेवेळी बोलत होते
सातारा प्रतिनिधी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वी मी अनेकदा लिहिले होते. ही माणसं कोणकोणत्या गोष्टींचा वापर करुन हत्या करणार ते. केवळ लिहून थांबलो नव्हतो तर ते लिखाण मी त्यावेळच्या राज्य आणि केंद्र सरकारकडे सादर केले होते. त्यानंतर डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. त्यावेळीही मी सर्वप्रथम बोललो होतो की, त्यांची हत्या ही सनातन संस्थेनेच केलेली आहे. असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी साताऱ्यात केला. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चांगला केला होता. परंतु पुढे सीबीआयकडे तपास केल्यानंतर काय झाले हे मला माहिती नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. साताऱ्यात किसन वीर महाविद्यालय वाई आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान परिषदेनिमित्त संस्थापक श्याम मानव हे आले होते. त्यावेळी ते तरुण भारतशी बोलत होते.
श्याम मानव म्हणाले, “डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. त्याच्या ही आधी मी लेख लिहिले आहेत. हत्या करणारी माणसं कोणकोणत्या गोष्टींचा वापर करुन हत्या करणार हे मी या अगोदर लिहिले होते. केवळ लिहिले नव्हते तर केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेले लेखन दिले होते. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यांची हत्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बोलणारा एकमेव मी असेन. ही हत्या इतर कोणीही केलेली नाही तर सनातन संस्थेने केलेली आहे. त्यानंतर लागोपाठ चार हत्या झालेल्या आहेत. दोन महाराष्ट्रातल्या आणि दोन कर्नाटकातील. या चारही हत्याच्या वेळी मी जाहीरपणे सांगितले होते की या हत्या सनातन संस्थेने केलेल्या आहेत. पण ते ज्या पद्धतीचे तंत्र वापरतात. त्यावेळी माझा पोलिसांशी डायरेक्ट संबंध आला होता. दाभोलकरांच्या हत्येचा शोध महाराष्ट्र पोलिसांकडे होता तोपर्यंत मला फर्स्ट हॅण्ड माहिती आहे. परंतु सीबीआयकडे गेल्यानंतर तपासाबाबत अपडेट नाहीत. आता सध्या काय तपास सुरु हेही माहिती नाही. दुसरे जे कोल्हापूरचे इन्व्हेस्टेगेशन चालू होते ते बराच काळ महाराष्ट्र पोलिसांकडून सुरु होते. मी त्यावरुन एवढेच सांगेन की महाराष्ट्र पोलिसांनी इमानदारीने काम केले. कोणतीही बेईमानी केलेली नाही. पण त्यांना पुरावे सिद्द करता येत नाहीत. सगळ्य़ांना माहिती आहे की, डॉ. दाभोलकर यांची हत्या कोणी केली. माणसं माहिती नाहीत पण संघटना तर 100 टक्के माहिती आहे. त्याचे पुरावे पोलिसांना सादर करता येत नाहीत. कारण ती माणसं ज्या पद्धतीने ट्रेन केलेली आहेत. हे मी खूप आधीच सांगत होतो. ही माणस सहजासहजी सापडणार नाहीत. त्यावेळेचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तिसऱ्या दिवशी सांगितले होते. त्यावेळी मला त्यांचा सुरक्षेकरता फोन आला होता. मी ती नाकारली होती. ते म्हणाले होते तुम्ही सुरक्षा नाकारु शकत नाही, तेव्हा मी त्यांना सहज विचारले होते. दाभोलकरांच्या तपासाचे काय होत आहे. त्यावेळी ते म्हणाले होते की एका दिवसात हत्यारांना जेलमध्ये घेतो. त्यावेळी मी त्यांना म्हटलं होते की ते सहजा सहजी मारेकरी पोलिसांना साडपणार नाहीत. सापडले तरी पुढचे कधी सापडणार नाहीत. माझं वाक्य इतकं खरे ठराव असे मला वाटले नव्हते. पण ते खरे ठरले. त्यामध्ये ज्या पद्धतीचे सनातन संस्थेवाले टेक्निक ते वापरत आहेत. त्या टेक्निकचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कुठलाही हलगर्जीपणा केलेला नाही. मारेकऱ्यांपर्यंत पोहचायचे नाही असे ठरवले असे कुठेही त्यांच्याकडून घडलेले नाही. सरकार बदलल्यानंतरही तेच केले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना सुद्धा त्यात काही बदल झाला नव्हता. पोलिसांमध्ये कुठेही बेईमानी झालेली नाही हे मी डेफिनेटली सांगू शकतो, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, मंत्रालयात झालेल्या पुजेवरुन त्यांनी स्पष्टीकरण दिले.