युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिले नियुक्तीचे पत्र
प्रतिनिधी/कोल्हापूर
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्तेपदी पुण्याचे डॉ. धनंजय जाधव आणि नाशिकचे करण गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संभाजीराजे यांनी या दोघांना दिले.
राज्यसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले होते. राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू करत स्वराज्य संघटनेचे काम सुरू केले होते. मराठवाडय़ातील अनेक जिल्हय़ात त्यांनी थेट जनतेशी, शेतकऱयांशी संपर्क आणि संवाद सुरू केला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या रूपाने संघटनात्मक बांधणीही सुरू केली आहे.
संघटनेची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते नियुक्त
स्वराज्य संघटनेची भूमिका व कार्य याबाबत वेळोवेळी माहिती देण्यासाठी प्रवक्ते पदी डॉ. धनंजय जाधव आणि करण गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात शनिवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. डॉ. जाधव आणि गायकर यांनी मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी ते गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहेत.