महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख, शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांची इंडियन बॉटनिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीच्या रूपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इंडियन बॉटनिकल सोसायटीची स्थापना 1920 मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या नागपूर येथील बैठकीत झाली.
कलकत्ता येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सचे दिवंगत डॉ. पी. ब्रुहल, कोईम्बतूर येथील कृषी महाविद्यालयाचे दिवंगत रायबहादूर के. रंगाचार, लाहोरच्या शासकीय महाविद्यालयाचे दिवंगत रायबहादूर प्रा. शिवराम कश्यप, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसीचे दिवंगत डॉ. प्रा. बिरबल साहनी, पुणे कृषी महाविद्यालयाचे डॉ. डब्ल्यू. बर्न्स आणि इविंग ख्रिश्चन कॉलेज, अलाहाबादचे दिवंगत डॉ. विन्फिल्ड डजॉन यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन बोटॅनिकल सोसायटीची स्थापना झाली. 1921 पासून आतापर्यंत महाराष्ट्रातून प्रा. एस. एल. आजरेकर (1926), प्रा. एस. पी. आघारकर (1933), प्रा. आर. एच. दस्तूर (1934), प्रा. टि. एस. महाबळे (1968), प्रा. आर. एम. पै (1997), प्रा. ए. आर. कुलकर्णी (2012) या शास्त्रज्ञांची निवड झाली होती. स्थापनेपासून आतापर्यंत महाराष्ट्रातून केवळ सहाजणांची निवड झाली आहे. त्यामुळे यंदा डॉ. एस. आर. यादव यांची निवड महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. डॉ. यादव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पतीशास्त्रातील शास्त्रज्ञ आहेत. आतापर्यंत त्यांनी 300 हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 26 पीएच. डी. तर 11 विद्यार्थ्यांनी एम. फिल पूर्ण केले आहे. वनस्पतीशास्त्र विभागामध्ये कार्यरत असताना त्यांनी 10 कोटीहून अधिक निधी विविध प्रकल्पासाठी सरकारकडून मिळवला होता. बोटॅनिकल गार्डनमध्ये पश्चिम घाटातील एक हजारहून जास्त वनस्पती फुलवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. 10 हून अधिक प्रजातींना डॉ. यादव यांचे नाव दिले आहे. तर स्वतः 75 हुन अधिक वनस्पती शोधून त्याचे नामकरण केले आहे. वनस्पतीशास्त्रावर अनेक संदर्भग्रंथ त्यांनी लिहले आहेत. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालय,भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱया जानकी अम्मल पुरस्काराचेसुद्धाते मानकरी आहेत. त्यांची इंडियन बोटॅनिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी झालेली निवड हि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा आहे.