ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारताच्या १५ व्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. युपीएच्या यशवंत सिन्हा यांचा त्यांनी पराभव केला आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीचा कौल हाती आला असून द्रौपदी मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा अधिक मतं मिळालं आहे. (Druapadi Murmu new president of India)
२५ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. तर, आज २१ जुलै रोजी सकाळपासून निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. आता अखेर निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत एनडीएने आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती. तर, युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. या दोघांची उमेदवारी जाहीर होताच द्रौपदी मुर्मू ही निवडणूक जिंकणार असं म्हटलं जात होतं. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. अखेर, द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून त्यांच्या रुपाने आदिवासी समाजाला राष्ट्रपती पदावर बसण्याची संधी मिळाली आहे.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली.
2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्या आमदार झाल्या.1997 ला रायनगरपूर नगर पंचायत मधून नगरसेवक पदावर निवडून आल्या. त्यानंतर आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. तसेच त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. दरम्यान आज त्यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.
हे ही वाचा : राज्यातले सण निर्बंधमुक्त; यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात