विसर्जनावेळी प्रमुख स्थळांवर जीवरक्षक तैनात
प्रतिनिधी / पणजी
राज्यात समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वावरणाऱया दृष्टी जीवरक्षक एजन्सीने यंदा गणेश विसर्जनात भक्तांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यातून राज्यातील सुमारे 40 समुद्रकिनाऱयांसह अन्य अनेक विसर्जन स्थळांवर जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. हे जीवरक्षक विधिवत पूजा झाल्यानंतर गरज तेथे प्रत्यक्ष विसर्जन प्रक्रियेत सहभाग घेतील तसेच विसजर्नासाठी पाण्यात उतरणाऱयांना सुरक्षितपणे किनाऱयावर आणण्यात मदत करतील.
हरमल, मोरजी, बागा, कळंगूट, कांदोळी, मिरामार, बायणा, कोलवा, पाळोळे यासारख्या प्रमुख समुद्रकिनाऱयांसह अन्य गावामधील प्रमुख विसर्जन स्थळांवर गणेश विसर्जनाच्यावेळी दृष्टी जीवरक्षकांना तैनात करण्यात येतील. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी अतिरिक्त बॅक-अप जीवरक्षकांची टीम आणि वाहनांचीही व्यवस्था दृष्टीतर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान, विसर्जनादरम्यान दारुच्या नशेत असल्यास पाण्यात उतरू नये, तसेच लहान मुले पाण्याच्या जवळ जाणार नाहीत याची पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन दृष्टीतर्फे करण्यात आले आहे.