आपल्याला नेहमी कार किंवा इतर स्वयंचलित वाहनांचे हॉर्न ऐकू येतात, ही वस्तुस्थिती आहे. कित्येकदा हे हॉर्नचे आवाज इतके मोठे आणि भेसूर असतात, की, आपली झोपमोड होते किंवा आपल्याला त्यांचा त्रास होतो. विशेषत: आपण मार्गक्रमण करीत असताना तर सातत्याने हॉर्नचा आवाज कानावर पडतो. कोठे ट्रॅफिक जॅम झाला असेल तर मागे अडकलेले वाहनचालक सातत्याने हॉर्न वाजवून त्यांची नाराजी व्यक्त करीत असतात. पण पुढचा वाहनचालक काही तेथेच थांबून राहण्यासाठी आलेला नसतो. मार्ग मोकळा झाला की तो पुढे जाणारच असतो. आपण मागून कितीही हॉर्न वाजविला तरी परिस्थितीत फरक पडणार नसतो, एवढा साधा शिष्टाचारही पाळला जात नाही. ध्वनीप्रदूषणाच्या समस्येत सातत्याने विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांचाही मोठा सहभाग असतो. भारतात सार्वजनिक शिस्तीचा कमालीचा अभाव असल्याचे हॉर्नचा अतिउपयोग होताना दिसतो.
पण याच आपल्या देशाच्या बिहार राज्यात पूर्णिया येथे गौतम पांडे नामक व्यक्ती अशी आहे, की ज्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये एकदाही हॉर्न न वाजवता आपली कार चालविली आहे. पांडे हे स्वत: कार चालवत दूरदूरचा प्रवास करुन आलेले आहेत. तथापि, एकदाही त्यांना हॉर्न वाजविण्याची आवश्यकता भासलेली नाही. अर्थातच, हॉर्नच्या अतीउपयोगामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणात त्यांचा सहभाग नाही, ही खरोखरच कौतुकाची आणि तितकीच आश्चर्याची बाब आहे.
पांडे हे संयुक्त राष्ट्र संघात इंजिनिअर पदावर कामाला होते. तेथून ते निवृत्त झाले असून 2019 मध्ये भारतात मूळगावी परतले. सुरक्षित कार चालविण्यासाठी हॉर्नचा सारखा उपयोग करण्याची आवश्यकता नसते हे विदेशात त्यांना समजले. कारण युरोप, अमेरिका आदी पुढारलेल्या देशांमध्ये हॉर्नचा उपयोग क्वचित केला जातो. पांडे यांनी भारतातही हाच प्रयोग करण्याचा निश्चय केला आणि भारतासारख्या सार्वजनिक बेशिस्तीच्या देशातही हे शक्य आहे हे दाखवून दिले. कार चालकांनी आपल्या काही चुकीच्या सवयी सोडल्यास आणि कार चालविताना पूर्ण लक्ष एकाग्र केल्यास हॉर्न वाजवावा लागत नाही. दूर, जवळ आणि आजूबाजूला दृष्टी फिरवत ठेवणे, रहदारीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, कार चालविताना बोलण्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी सोप्या मार्गांनी आपण हॉर्नचा उपयोग टाळू शकतो असे पांडे स्वानुभवाच्या आधारावर स्पष्ट करतात.