प्रातःकाळी स्नान उरकून गळय़ात टाळ अडकले की देवळात मनाने प्रवेश झालेला असतो. पांडुरंगाच्या समोर लावलेला पडदा बाजूला सारला की देव कटेवर कर ठेवून आपलीच वाट बघत उभा असतो, असं वाटायला लागतं आणि ते शंभर टक्के खरंही आहे. पुंडलिका सारखी भक्ती तुमच्या आमच्यात निर्माण झाली आहे, हे बघायला तो 28 युग उभा आहेच. आम्हाला या निमित्ताने मात्र जाग येते आणि लक्षात येतं की सर्व संत आम्हाला या काकड आरतीला आवर्जून यायला सांगतात.
नामदेवांनी लिहिलेली आरती सगळय़ाच विठ्ठल मंदिरातून काकडय़ाच्या वेळी आवर्जून म्हटली जाते. भक्त पुंडलिकानंतर पांडुरंगाला मिळालेलं हे भक्तीचे दुसरे अपत्य. सारं आयुष्यच पांडुरंगमय. संत शिरोमणी नामदेव भक्ती रसात चिंब होऊन आयुष्य जगले. या कलियुगात विठ्ठलाला प्रेम भक्तीची खीर खायला चैतन्य रुपात अवतार घ्यायला विठ्ठलाला यायलाच लागले. नामदेवांच्या घरी दिवाळी साजरे करणारे देव जनाबाईच्या कर्मयोगाला प्रति÷ा देणारे देव, साऱया भारतात भागवत धर्माची पताका मिरवायला नामदेवाला प्रेरित करणारे देव म्हणजेच विठोबाराय आम्हाला पंढरपुरात भेटतात. त्यासाठी नामदेवाच्या पायरीला आदराने नमस्कार करायला लागतो. पांडुरंगाच्या पायाशी पायरीवर समाधी घेणारे नामदेव त्यांचे दर्शन आधी घेतल्यानंतर मगच विठ्ठलाचे मुखदर्शन सगळय़ा भक्तांची संतांची पाय धूळ आपल्या शिरावर पडावी आणि आपल्या जन्माचे सोनं व्हावं याच हेतूने आणि दास्यभक्ती सांगण्याच्या उद्देशाने आजही नामदेव कीर्ती रुपी मागे उरलेले दिसतात. हा महिमा पंढरपुरात पाहायला मिळतो. ते प्रत्येक भक्ताला देवाच्या दर्शनासाठी तातडीने हात पाठवतात कारण देवाचे दर्शन म्हणजे आत्मसाक्षात्काराची अनुभूती. माणसाच्या जगण्याचं सार्थक करणारी अवस्था उपासनेत असल्यामुळे देवाला माणसाप्रमाणे निजवतो उठवतो, खाऊ घालतो, दृष्ट काढतो, वारा घालतो आणि विविध उपचार सुद्धा करतो पण तो मात्र डोळे उघडे ठेवून टक्कर जागाच असतो. आम्ही देवळात निघतो म्हणजे क्रियाशील परमार्थ सुरू होतं यालाच प्रपंचात राहून परमार्थ करण्याची स्थिती म्हणतात.
काकड आरतीच्या निमित्ताने आम्ही जे नामस्मरण करतो ते वाणिच्या साह्याने जिभेच्या सहाय्याने आणि शब्दांच्या साह्याने. उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख आणि हरिपाठ ज्ञानदेव लिहितात जीवेगुरी उठल्यावर फक्त नामस्मरण आणि देवदर्शन करण्याचा अगदी सुंदर आणि योग्य मार्ग म्हणजे ही काकड आरती. यातच हरिपाठ म्हटला जातो. पोथ्या वाचल्या जातात आणि संतांचे अभंग गायले जातात तसेच पुन्हा पुन्हा नामस्मरण केलं जातं. द्वारकेचे राहणे पांडवाघरी असं म्हणताना आमच्या मनात साधा सरळ विचार येतो की श्रीकृष्ण द्वारकेचा राजा असूनसुद्धा आपल्या आत्याच्या घरी म्हणजे पांडवांच्या घरी राहिला. साऱया जगाचा सत्ताधीश असलेला हा ब्रह्मचैतन्याचा अंश खरं म्हणजे आपला आत्मा बनून आमच्यातच असतो. आमच्यातील पाच इंद्रियांच्या घरी म्हणजे पाच पाच पांडवांच्या घरी राहायला आलेला असतो. म्हणूनच या काकडय़ाच्या निमित्ताने हे आत्मभान यावं यासाठी हे सगळं नामस्मरण त्यासाठी मात्र मन निर्विचार व्हायला लागतं. दुष्ट विचारांचे सुंभ जळायला लागतात आणि तेव्हाच काकडय़ाच्या उजेडात देवाचं मुखदर्शन होतं. आमचे डोळे उघडतात. आमची निद्रावस्था जाते. देव सदैव जागा आहेच आणि म्हणूनच संत म्हणतात काकडय़ाच्या निमित्ताने निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे.