वार्ताहर/ एकंबे
सातारारोडनजिक असलेल्या भक्तवडी-रेवडी रस्त्यावरील वसना नदीवरील बंधाऱयात पोहण्यास गेलेल्या ऊस तोडणी कामगार सुरेश बंडू उगले याचा बुडून मृत्यु झाला, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगावच्या दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांचा देखील बुडून मृत्यु झाला. या घटनेमुळे कोरेगाव शहरात शोककळा पसरली आहे. बर्गे यांच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, उगले याचा मृतदेह दुसऱया दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार भक्तवडी येथे एका साखर कारखान्याची ऊस तोडणाऱया कामगारांची टोळी दाखल झाली असून, या टोळीतील कामगार सुरेश बंडू उगले हा आपल्या मित्रांसमवेत वसना नदीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उडी मारल्यानंतर तो बुडाला. त्याचा मृतदेह सापडलाच नाही. ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त केली, मात्र मृतदेह सापडला नसल्याने कोरेगाव पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱयांनी कोरेगावातील पट्टीचे पोहणारे दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांना मोबाईलवरुन संपर्क साधला आणि मृतदेह काढण्यासाठी बोलावून घेतले. गुरुवारी दुपारच्या सुमारास बर्गे हे नदीपात्रात उतरले. मात्र त्यांचाच बुडून मृत्यु झाला. तासाभरात त्यांचा मृत्यु पाण्यावर तरंगताना आढळला.
पोलिसांनी बर्गे यांचा मृतदेह एका खाजगी गाडीतून ग्रामीण रुग्णालयात आणून नेला. त्यांनी बर्गे कुटुंबियांना अथवा नातेवाईकांना कोणतीही कल्पना दिलीच नाही, त्यानंतर पोलीस निघून गेले. रुग्णालयातील महिला परिचारिकेमुळे बर्गे कुटुंबियांना घटनेची माहिती समजली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंबियांसह नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांनी पोलीस अधिकाऱयांना जाब विचारला, वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेरीस चर्चेद्वारे तणाव निवळला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी राहूल पुरुषोत्तम बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, संदर्भीय प्रकार हा गंभीर असून, अतिशय संशयास्पद आहे. दत्तात्रय बर्गे यांच्या मृत्युची व संशयित प्रकाराची चौकशी करण्यात यावी. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.