दि. 9, 10 आणि 12 रोजी मद्यविक्री बंद
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 186 पंचायतींसाठी येत्या दि. 10 ऑगस्ट रोजी होणाऱया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवस मद्यविक्रीवर बंदी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या मतदानापासून मतमोजणीपर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे.
वित्त खात्याचे अवर सचिव प्रणव भट यांनी दि. दि. 09, 10 आणि 12 ऑगस्ट हे तीन दिवस कोरडे दिवस घोषित करणारी अधिसूचना शुक्रवारी जारी केली आहे.
राज्या 186 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने वरील तिन्ही दिवशी संपूर्ण राज्यात मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीनिमित्त मद्यविक्रीसाठी सर्व परवानाधारक बार बंद ठेवण्यात येतील. जनहिताच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
तथापि, ’बार आणि रेस्टॉरंट’ साठी परवाना असलेल्या विक्रेत्यांना केवळ जेवण विक्रीसाठी रेस्टॉरंट खुले ठेवता येणार आहे. मात्र तेथील बार काउंटर बंद ठेवावे लागेल, आणि वर नमूद केलेल्या तिन्ही दिवशी कोणतेही मद्य विक्री करता येणार नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याशिवाय ’येथे केवळ रेस्टॉरंट खुले असेल, मद्य विक्री होणार नाही’, असे स्पष्ट करणारा फलक ’बार आणि रेस्टॉरंट’ असलेल्या परवानाधारक आस्थापनाच्या परिसरात संबंधित मालकाने लावावा, असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. राज्यात दि. 10 ऑगस्ट रोजी पंचायत निवडणूक होणार असून दि. 12 रोजी मतमोजणी होणार आहे.
खर्च मर्यादा केवळ 40 हजार रुपये
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका आदेशान्वये पंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास त्याच्या संबंधित मतदारसंघात 40 हजार रुपयेपर्यंत खर्च करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे भरारी पथकाच्या नजरेत आल्यास उमेदवारावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू व्ही रमणमूर्ती यांनी दिला आहे.
सध्या निवडणूक प्रचाराने जोर धरला असून प्रत्येक उमेदवार घरोघरी प्रचार करण्यावर भर देत आहे. 8 ऑगस्ट रोजी प्रचार संपुष्टात येणार आहे. त्यादरम्यान सोबत फिरणाऱया कार्यकर्त्यांसाठी विविध प्रकारे खर्च करावा लागतो. मात्र केवळ 40 हजार रुपयेपर्यंतच मर्यादित ठेवता येणार आहे.