राज्यातील सरपंच-उप सरपंचपदांसाठी आज निवडणूक
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील अलिकडेच झालेल्या 186 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीनंतर आता आज सोमवार 22 ऑगस्ट रोजी सरपंच व उपसरपंचासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व नवनियुक्त पंचायत सदस्यांची बैठक आज ग्राम पंचायत कार्यालयात होणार आहे.
भाजपचे मंत्री, आमदार यांनी आपापल्या मतदारसंघातील बहुतेक पंचायतीत समर्थकांना ती पदे देऊ केली असून काही पंचायतीत मात्र मतैक्य न झाल्यामुळे दोन्ही पदांसाठी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपने बहुतांश पंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे. ज्या पंचायती भाजपच्या ताब्यात आलेल्या नाहीत तेथे कसेही करून भाजपच्या समर्थकांना सरपंच, उपसरपंच करण्याचे प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहेत.
स्थानिक आजी-माजी आमदारांनी आपापले कार्यकर्ते समर्थक सरपंच-उपसरपंच व्हावेत म्हणून प्रयत्न चालवले असून तेथे आपले वर्चस्व रहावे म्हणून खटपटी चालवल्या आहेत. बुधवार 10 ऑगस्ट रोजी पंचायतीसाठी मतदान झाले होते आणि शुक्रवारी 12 ऑगस्टला मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्यात आले होते. या निवडणुकीत अनेक पंचायतीत नवीन चेहरे निवडणून आले असून त्यांनाही सरपंच-उपसरपंच पदाचा लाभ मिळवणार अशी लक्षणे दिसत आहेत. अनेक पंचायतीत सरपंच-उपसरपंच एकमताने निश्चित झाल्यामुळे तेथे त्यासाठी निवडणूक होणार नाही. दोन्ही पदांसाठी दोन-दोन अर्ज आले तरच त्या पदांकरीता निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले.
या पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या महिला उमेदवारांची संख्या मोठी असून अनेक पंचायतीत त्यांना सरपंच, उपसरपंचपदे राखीव ठेवण्यात आली आहेत. शिवाय राखीव नसलेल्या पंचायतीतही महिलांना वरील दोन्ही पदे मिळण्याची संधी आहे. त्यामुळे आता महिला सरपंच, उपसरपंच यांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.