अध्याय एकतिसावा
शुकमुनी म्हणाले, अवताराच्या शेवटी श्रीकृष्णांनी ज्या परमगतीने निजधाम जवळ केले त्याला अति उत्कृष्ट योगस्थिती असं म्हणतात. ह्या परमपदवीचे महात्म्य एव्हढे आहे की, जो कुणी सकाळच्यावेळी भक्तियुक्त अंत:करणाने ही चौदा श्लोकांची ‘श्रीकृष्णपरमपदवी’ वाचेल तो उत्तमत्वाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ह्या श्लोकांचे रोज जो गायन करेल त्याच्या चारही मुक्ती दासी होतील. तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो हे श्लोक वाचत राहिला तर त्याला श्रीकृष्णपदवी प्राप्त होईल. श्रीकृष्णपरमपदवीचे हे श्लोक चौदा विद्यांचे जन्मस्थान आहेत. ते पठण करणाऱ्या भक्ताला त्या चौदा विद्या पूर्णपणे अवगत होतील. ह्या श्लोकांचे पठण करून कृष्णपदवी प्राप्त झालेल्या भक्ताला चौदा भुवने प्राप्त होतील. तसेच त्याला चौदा पदे गयावर्जन करून पिंडदान केल्याचे समाधान मिळेल. हे चौदा श्लोक म्हणजे चौदा इंद्रांचे जीवन आहे. जो ह्या श्लोकांचे नियमित पठण करेल अशा कृष्णपदवी प्राप्त भक्ताला सगळ्या इंद्रांवर स्वामित्व मिळेल. हे चौदा श्लोक म्हणजे वेदांची चौदा कांडे आहेत. त्यांचे नियमित पठण करणाऱ्या भक्ताला वादात कुणीही हरवू शकणार नाही. ह्या चौदा श्लोकांच्या नियमित पठणामुळे मायेचे त्रिगुण, कर्म आणि वर्ण ह्यांचे संसारावरील प्रभुत्व नष्ट होते. त्यामुळे त्यांचा बिमोड होऊन परिपूर्ण ब्रह्मज्ञान हाताला लागते.
सकाळच्यावेळी ह्या श्लोकांच्या केलेल्या नियमित पठ्णामुळे श्रीकृष्णपदवी प्राप्त होते, चौदा विद्या अवगत होतात, चौदा भुवने प्राप्त होतात, सगळ्या इंद्रांवर स्वामित्व मिळते, गयावर्जन करून पिंडदान केल्याचे समाधान मिळते, वेदविद्येत प्राविण्य मिळाल्याने वादात त्याला कोणी हरवू शकत नाही असे अनेक लाभ होतात पण हे सगळे लाभ कायम टिकणारे नाहीत कारण त्यात प्राप्त होणाऱ्या गोष्टी ह्या नश्वर आहेत पण तिन्ही त्रिकाळ ह्या श्लोकांचे जो पठण करेल त्याला मात्र श्रीकृष्णाच्या देहात विसावा मिळेल. त्याला श्रीकृष्णपद आंदण दिल्यासारखे होईल. त्यामुळे हा चिरंतन टिकणारा लाभ त्याच्या पदरात पडेल. अतिशय श्रमाचे साधन करूनही ब्रह्मज्ञान मिळण्याची खात्री देता येत नाही पण ह्या चौदा श्लोकांचे श्रद्धेने श्रवण, पठण केले श्रीकृष्णपदवी मिळाल्याने ब्रह्मज्ञान विनासायास पदरात पडते. साधक परिपूर्ण ब्रह्म झाल्यामुळे नीजनिर्वाणही साधले जाते. शुकमुनींनी परमार्थसिद्धी साधून देणारे हे गुह्य निरुपण परीक्षित राजाला सांगण्याच्या निमित्ताने सर्वांसाठी खुले केले. तक्षकासारख्या अत्यंत विषारी नागाच्या भयापासून निवृत्ती तसेच देही असून विदेह प्राप्ती होण्यासाठी हा सुगम उपाय शुकमुनींनी परीक्षित राजावर कृपा करून प्रतिज्ञापूर्वक सांगितला.
हा उपाय जरी सुगम असला तरी माणसाची त्यावर श्रद्धा बसेलच असे नाही. ज्याची ह्यावर श्रद्धा बसणार नाही तो त्याच्या उद्धाराची संधी गमावून बसेल आणि त्यामुळे संसारसागरात बुडून जाईल. मी कर्ता आहे आणि समोर दिसणारे जग खरे आहे ही त्याची अज्ञानातून उद्भवलेली समजूत तो कवटाळून बसल्यामुळे तो अविद्येचा जावई होऊन राहील. जावई म्हणायचं कारण म्हणजे जावयाचे सासुरवाडीत विशेष कौतुक केले जाते त्याप्रमाणे अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा जावई झालेल्या अश्रद्ध माणसाच्या वर सांगितलेल्या गैरसमजांना खतपाणी घालून ते आणखीन कसे फोफावतील ह्याची पुरेपूर काळजी त्याची अज्ञानरुपी सासू घेत असते. तो त्या अज्ञानावरच पोसला जातो आणि विषय त्याचा उतम प्रतिपाळ करतात म्हणजे आपल्या सेवनातच खरे सुख दडलेले आहे अशी त्याची खात्री पटवतात. त्यामुळे अज्ञानाच्या आहारी जाऊन विषयसेवन करण्यामध्येच तो धन्यता मानतो. असो ह्या मूर्ख लोकांच्या गोष्टी फार काळ न बोललेल्याच बऱ्या कारण कोळसा कितीही उगाळला तरी काळाच असतो.
क्रमश: