प्रवाशांना वडाप वाहनांचा आधार : बसफेऱया वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कडोली परिसरात अपुऱया आणि अनियमित बससेवेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांची हेळसांड होताना दिसत आहे. कडोली गावाला स्वतंत्र बस नसल्याने विद्यार्थ्यांना केदनूर, मण्णीकेरी आणि कट्टणभावी बसवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र बसफेऱया कमी असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांना लोंबकळतच प्रवास करावा लागत आहे.
कडोली भागातून शहराकडे येणाऱया नोकरदार, कामगार आणि शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या तुलनेत या मार्गावर केवळ तीन बस धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास असूनदेखील खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसत आहे. बंबरगा, देवगिरी गावांना स्वतंत्र बस नसल्याने कट्टणभावी बसवर अवलंबून रहावे लागत आहे. मण्णिकेरी, केदनूर व कट्टणभावी बसेस गावातूनच भरून येत असल्याने बंबरगा, कडोली, गुंजेनहट्टी, देवगिरी, जाफरवाडी बसथांब्यावर बस न थांबताच पुढे जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. परिवहनकडे याबाबत कित्येकवेळा तक्रार देऊनदेखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांचा बसच्या दरवाजात लोंबकळत प्रवास
या मार्गावर बसफेऱया कमी असल्याने प्रवाशांना वडाप वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. बसपास असूनदेखील विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहेत. शिवाय बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी बसच्यामागे धावतात. त्यामुळे अपघाताची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे परिवहनने या मार्गावर नियमित जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.