लोंबकळत प्रवास : सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : निवेदने देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च
बेळगाव : अनियमित आणि अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. शक्ती योजनेपासून बससेवेचे तीनतेरा झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची यामध्ये घुसमट होऊ लागली आहे. विविध मार्गांवर विद्यार्थी लोंबकळत प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. याबाबत आता सरकार व परिवहन मंडळ गांभीर्य घेणार का? हेच पाहावे लागणार आहे. बेळगाव विभागामध्ये बसेसची कमतरता आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. या वेळेतच अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना दरवाजातच लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. विशेषत: ग्रामीण भागात अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत कित्येकवेळा परिवहनकडे निवेदने देऊन देखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास वितरण प्रक्रियेलाही प्रारंभ होतो. यंदादेखील शैक्षणिक वर्षापासूनच बसपास वितरण प्रक्रियेचे कामकाज सुरू झाले आहे. विद्यार्थी बसपास काढू लागले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना पास असूनदेखील बस वेळेत मिळेनाशा होऊ लागल्या आहेत. विशेषत: अपुऱ्या बससेवेमुळे धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास याला कोण जबाबदार? असा प्रश्नही पडू लागला आहे.
शर्यतीप्रमाणे विद्यार्थी धावू लागले बसच्या पाठीमागे
सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत बसमध्ये जागा पकडण्यासाठी शर्यतीप्रमाणे विद्यार्थी बसच्या पाठीमागे धावू लागले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय लहान वर्गातील मुलांना बसमध्ये चढणेही अशक्य आहे. त्यामुळे बसचा प्रवास विद्यार्थ्यांच्या मुळावर येऊ लागला आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.