तानाजी गल्ली कॉर्नरवर गळती दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
तानाजी गल्ली कॉर्नर येथे जलवाहिनीला गळती लागल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रविवारी सकाळी सदर जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणात गळती लागून तब्बल चार तास पाणी वाया गेले. गळती निवारणाकडे आणि पाणीपुरवठा बंद करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हजारो लिटर पाणी गटारीतून वाहून गेल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
शहरातील गळती निवारणाकडे एल ऍण्ड टी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली तानाजी गल्ली कॉर्नरजवळ जलवाहिनीला लहान प्रमाणात गळती लागली होती. दोन महिन्यांपासून या गळतीद्वारे पाणी वाया जात होते. याबाबत वॉल्व्हमन आणि एल ऍण्ड टी कंपनीकडे तक्रार करण्यात आली होती. पण दोन महिन्यात या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली नाही.
दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याने रविवारी सकाळी पाण्याच्या उच्च दाबामुळे जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणात गळती लागून पाणी वाहू लागले. सकाळी 7 वा. गळती लागल्यानंतर याबाबत नागरिकांनी एल ऍण्ड टीकडे तक्रार केली होती. पण याची दखल घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने 11 वाजेपर्यंत पाणी वाया गेले. एकीकडे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे गळती निवारण करण्याकडे दुर्लक्ष करून पाणी वाया घालविण्याचा प्रकार सुरू आहे.
येथील पाणी गटारीमध्ये वाहून जात असून सुमारे चार तास पाणी गटारीमध्ये गेले. या जलवाहिनीद्वारे समर्थनगर परिसरात पाणीपुरवठा केला जातो. पण या गळतीमुळे समर्थ नगरच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. एल ऍण्ड टी कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.