मनपातील कार्यालयासमोर वाढली गर्दी
बेळगाव : जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी गर्दी होत असतानाच पुन्हा सर्व्हरची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू दाखल्यासमोर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. बेंगळूर येथूनच ही समस्या असल्यामुळे नागरिकांबरोबर त्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हरची समस्या नेहमीच भेडसावत आहे. अचानकपणे सर्व्हरडाऊन होत आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. यापूर्वीही अनेकवेळा सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर मंगळवारीही ही समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांकडून त्रास सहन करावा लागला होता. सध्या पावसाने उसंत घेतली असून ऊन पडले आहे. त्या उन्हातच ताटकळत थांबावे लागत आहे. जन्म आणि मृत्यू दाखला हा अत्यंत महत्त्वाचा असतो. यामुळे सारेच या दोन्ही कागदपत्रासाठी धडपडत असतात. एकतर नवीन नियम लावून नाहक त्रास दिला जात आहे. त्यातच सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. सर्व्हरडाऊनची समस्या ही बेंगळूर येथूनच होत आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनाही ती समस्या सोडविणे अवघड झाले आहे.