बेळगाव : सतत गजबजलेल्या महानगरपालिकेमध्ये मंगळवारी मात्र शुकशुकाट पसरला होता. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना मतमोजणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यामुळे महानगरपालिकेमध्ये अधिकारी व कर्मचारीच नसल्याने कामानिमित्त आलेल्या जनतेला रिकाम्या हाती परतावे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी गुंतले आहेत. मतदान झाल्यानंतर कामावर हजर झाले तरी निवडणुकीसंदर्भातील विविध कामे त्यांना लावण्यात आली होती. कागदपत्रांची जुळवाजुळव करून मतमोजणीच्या ठिकाणी पाठविण्याचे काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. आता मतमोजणी पूर्ण झाली. याचबरोबर आचारसंहिताही संपणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवसांनीच कामाला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जन्म व मृत्यू दाखल्याचे विभाग वगळता इतर सर्वच विभाग बंद होते. त्यामुळे इमारत परवाना असो किंवा इतर कोणतीही कामे असो त्यासाठी आलेल्या जनतेला रिकाम्या हातीच परतावे लागले. नेहमी महानगरपालिकेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे पार्किंग केले जाते. याचबरोबर विविध कामांसाठी जनतादेखील उपस्थित असते. मात्र मंगळवारी वाहनांची संख्या अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले. एकूणच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमध्ये शुकशुकाट पसरला होता.
Previous Articleकडोलीत प्रियांका जारकीहोळींच्या विजयाचा आनंदोत्सव
Next Article सोमवारपेठ परिसरात वाहतूक कोंडी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.