प्रतिनिधी /खानापूर
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येथील शिवस्मारकात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण होते. यावेळी आबासाहेब दळवी प्रास्ताविक करताना म्हणाले, सीमाभाग समन्वय मंत्री सीमाभागाच्या दौऱयावर येत आहेत. त्यामुळे खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे त्यांना भेटून सीमाप्रश्नाबद्दल व खानापूर तालुक्याच्या विविध प्रश्नांबद्दल चर्चा करण्यात सहभागी व्हावे, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या समन्वय मंत्र्यांच्या दौऱयामुळे सीमाभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मंत्र्यांनी सीमाभागातील समस्यांबरोबरच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी नियोजन करणे, तसेच केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करून हा प्रश्न निकालात काढण्यासाठी काय करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण म्हणाले, सीमाभागाच्या दौऱयावर प्रथमच दोन्ही समन्वय मंत्री येत आहेत. ही फार मोठी जमेची बाजू आहे. यासाठी तालुक्यातील समस्त समिती कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी समन्वय मंत्र्यांची भेट घेऊन आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जाणीव करून द्यावी. तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तातडीने क्रम घेण्यात यावा आणि न्यायालयातील दाव्याबरोबरच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी हालचाली करणे गरजेचे आहे.
विलास बेळगावकर म्हणाले, समन्वय मंत्र्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भात ठोस कृतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नारायण कापोलकर म्हणाले, सीमाभागातील युवकांना नोकरीत सामावून घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी समन्वय मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करून मार्ग काढण्यात यावा. यावेळी मारुती परमेकर म्हणाले, मध्यवर्तीच्या माध्यमातून सर्वांनी कर्नाटकच्या दडपशाहीतून कशी मुक्तता होईल, हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने आता ठोस पावले उचलावित. रमेश धबाले यांनी समितीच्या पुढील नियोजनाबाबत तसेच समन्वय मंत्र्यांकडे सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सर्वानुमते तोडगा द्यावा, असे सांगितले. अनिल पाटील यांसह इतर कार्यकर्त्यांनीही विचार मांडले.
यावेळी मुरलीधर पाटील, शिवाजी पाटील, अमृत पाटील, रमेश देसाई, अनिल पाटील, नारायण लाड, वसंत नावलकर, रुक्माण्णा झुंजवाडकर, अविनाश पाटील, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, मऱयाप्पा पाटील, प्रदीप पाटील यांसह इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.