नंदगड / वार्ताहर :
नंदगड हलशी,मेरडा,नागरगाळी परिसरात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सायंकाळी चार वाजता देवराई येथील पुलावर तीन फूट पाणी आल्याने काही काळ या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. तर विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून आपापल्या घरी नेण्यासाठी जीवाचा धोका पत्करून स्थानिकांना मोठे प्रयत्न करावे लागले.
हलसी-देवराई रस्त्यावर देवराई गावाजवळ लहान नदी वजा नाला आहे. मेरडा, सुलेगाळी, बस्तवाड, हलगा, परिसरातील व जंगलातील पाणी या नाल्यातून पुढे कापोली जवळ पांढरी नदीला मिळते. शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून या परिसरात मोठा पाऊस झाला. पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी नाल्याला आले. या नाल्यावरील पुलाची उंची कमी राहील्याने नाल्यावरील रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे सायंकाळी चार वाजल्यापासून काही काळ रस्ता बंद झाला. खानापूरहून हलशी मार्गे देवराईला गेलेली खानापूर -देवराई बस नाल्यावर पाणी आल्याने पुन्हा खानापूर कडे परत आली. त्यामुळे हलशी, नंदगड, खानापूर, बेळगाव येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाल्या जवळ उतरविण्यात आले. नाल्याला पाणी आल्याने धोका ओळखून पालकांनी आपल्या मुलांना व नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे नाल्यापलीकडे आपल्या गावी घेऊन गेले. पुराचे पाणी जोरात जात असल्याने धोकाही तितकाच होता. परंतु गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी चौख काम बजावल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. पावसाळ्यात अनेक वेळा या पुलावर पाणी येते. या पुलाची उंची वाढवावी म्हणून अनेक वेळा या भागातील जनतेने मागणी केली. परंतु या पूलाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.