दर्शनासाठी 50 रुपये शुल्क ः मुखदर्शनाची सेवा बंद केल्याने भाविकांतून नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
विविध साहित्यावर जीएसटी लागू करण्यात आल्याने महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. आता देव-देवतांचे दर्शनदेखील महागले आहे. सुळेभावी येथील महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आल्याने मुखदर्शन घेणे मुश्कील बनले आहे. देवीच्या दर्शनासाठी 50 रुपये देऊन रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे देव-देवतांचे दर्शनदेखील महागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रत्येक अमावास्येदिवशी तसेच मंगळवार, शुक्रवारी सुळेभावी येथील लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. गर्दी टाळण्याच्या नावाखाली मंदिराच्या प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात येत आहेत. परिणामी भाविकांना मुखदर्शन मिळणे मुश्कील बनले आहे. दर्शनासाठी रांगेत थांबा अन्यथा, देणगी पावती घ्या, अशी सूचना करण्यात येत आहे. नागरिकांकडून देणगी वसूल करण्यासाठी संपूर्ण मंदिर बंदिस्त करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर कमिटीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी काही ग्रामस्थांनी व्यवस्थापन मंडळाकडे याबाबत तक्रार करून मुखदर्शन कसे घ्यायचे? अशी विचारणा केली. तसेच मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी केली. पण व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांनी केवळ तक्रारदारासाठी प्रवेशद्वार खुले करून दिले.
सुळेभावी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी मुखदर्शनाची सेवा बंद करून भाविकांना रांगेत उभे राहण्यास भाग पाडल्याने भाविकांची गैरसोय झाली. मंदिर व्यवस्थापनाच्या या कारभाराबद्दल भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिर कमिटीने मुखदर्शन सुरू ठेवण्याची मागणी
शनिवारी अमावास्या असल्याने बेळगाव परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. मात्र देवस्थान कमिटीने मुखदर्शनाची सेवा बंद केली व सामान्य भाविकांसाठी एक रांग व 50 रुपये शुल्क दिलेल्या भाविकांसाठी एक रांग अशा दोन रांगा लावण्यात आल्या होत्या. देवीचे मुखदर्शन मिळणार नाही, ज्यांना दर्शन हवे आहे त्यांनी रांगेत उभे रहावे, असे सांगण्यात येत होते. मात्र ज्यांना रांगेत उभे राहण्यास वेळ नाही व केवळ मुखदर्शन घेण्यासाठी जे भाविक आले होते, अशा भाविकांची मात्र गैरसोय झाली. मंदिर कमिटीच्या या धोरणामुळे अनेक भाविकांना देवीचे दर्शन न घेताच माघारी परतावे लागले. यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मंदिर कमिटीने यापुढे तरी मुखदर्शन सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.