ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात शिवाजी पार्कवरून सुरू असलेली दसरा मेळाव्याबद्दलची लढाई अखेर शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने जिंकली. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका कायद्याचा गैरवापर करत असल्याचे देखील उच्च न्यायालयाने नमूद केले. गेल्या 7 दशकांपासून दसरा मेळाव्यात कधीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही असं ठणकावत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेचा ५ ऑक्टोंबरला दसरा मेळावा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला न्यायालयीन लढाईत मोठा धक्का बसला आहे.
प्रथम अर्जाचा मुद्दा मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. तसंच, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरीता पोलिसांनी कडक काळजी घेण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमळ खाता यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. शिवसेनेने दाखल केलेली याचिका आणि सदा सरवणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर संयुक्तपणे सुनावणी पार पडली.
हे ही वाचा : दिल्लीत अज्ञात ठिकाणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला आणि एकनाथ शिंदेंची भेट
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दसरा मेळावा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी एकनाथ शिंदे गटानेही दावा केला. त्यासाठी शिवसेनेपाठोपाठ शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता मुंबई पालिकेकडे परवानगी द्यावी असा अर्ज केला. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यावरून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं.
‘शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळू नये. कारण शिवसेनेकडून अनिल देसाई (Anil Desai) यांनी महापालिकेत अर्ज केला होता. अनिल देसाई हे सध्या कोणत्याच पदावर नाहीत. त्यामुळे त्यांना अर्ज करण्याचा अधिकार नाही,’ असं सदा सरवणकरांनी या याचिकेत म्हटलं होतं. ही याचिकाच मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे