कामाचा ताण वाढल्याने महसूल निरीक्षकांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट : ताण कमी करण्याची मागणी
बेळगाव : महापालिका महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे विविध कामांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. आता यामध्ये आणखी एका जबाबदारीची भर पडली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर कर्तव्य बजावावे लागणार आहे. मात्र महसूल निरीक्षकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कामाचा ताण वाढल्याबाबत तक्रार नोंदविली आहे. तसेच कामाचा ताण कमी करावा, अशी विनंती केली आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर वसुली, निवडणूक मतदारयाद्या तयार करणे, शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. तसेच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कामांचा व्यापदेखील वाढला आहे. अशातच चेकपोस्टवर कर्तव्य बजावण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी महसूल निरीक्षकांना दिला आहे. चेकपोस्टवर दक्षिण आणि उत्तर दोन्ही मतदारक्षेत्रात 72 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची सूचना यापूर्वी केली होती. त्यानुसार त्याकामात मनपाचे कर्मचारी व्यस्त आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 55 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी आतापर्यंत 50 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. उर्वरित 5 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे. 31 मार्चपूर्वी उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल विभागाकडून घरपट्टी वसुलीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत आणि आक्षेपार्ह जाहिरात फलक हटविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार महापालिकेकडून ही जबाबदारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
दिवस-रात्र नियुक्ती
अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम कर्मचाऱ्यांकडून राबविण्यात येत आहे. याव्यतिरिक्त कार्यालयीन कामकाज, निवडणूक मतदारयादी अशी विविध कामेदेखील करावी लागत आहेत. याचबरोबर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या चेकपोस्टवर कर्तव्य बजावावे लागणार आहे. तर रात्र आणि दिवसपाळीसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
तुमचे योगदान काय? आयुक्तांचा प्रश्न
य् ााबाबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन कामाचा ताण कमी करावा, अशी विनंती केली. घरपट्टी वसुली तसेच अन्य काम लागत असल्याने चेकपोस्टवरील तपासणीची जबाबदारी अन्य कर्मचाऱ्यांवर सोपवावी, अशी विनंती केली. घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारीदेखील देण्यात आली असल्याने काम वाढले आहे. असे सांगताच आयुक्तांनी नकार दिला. तर घरपट्टी वसुली तुम्ही केला नसून नागरिकांनी स्वत:हून घरपट्टी जमा केली आहे. त्यामध्ये तुमचे योगदान काय? असा उलट प्रश्न महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना केला. तसेच निवडणुकीचे काम तुम्हालाच करावे लागणार, असे सांगितले. त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी नाराज झाले आहेत. कामाचा ताण वाढल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था मनपा कर्मचाऱ्यांची झाली आहे.