शेतकऱयांचे उत्पन्न सात वर्षात दुप्पट करण्याची योजना केंद्र सरकारने चालविली आहे. मात्र, अशा योजना केवळ सरकारच्या पुढाकाराने यशस्वी होत नसतात. त्यासाठी या योजनांच्या लाभार्थींनीही स्वतःची कल्पनाशक्ती उपयोगात आणून प्रयत्न करावयाचे असतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका शेतकऱयाने असाच प्रयत्न करून अवघ्या पाच वर्षात आपली कमाई आठपट वाढविली आहे.
हरिश्चंद्र नामक हा शेतकरी खरे तर अल्पभूधारक आहे. त्याच्याकडे अवघी एक एकर जमीन आहे. या जमिनीला जलसिंचनाची कोणतीही सोय नाही. केवळ पावसाचे पाणी हाच आधार आहे. अशा परिस्थितीत खरे तर शेतकरी जमीन विकणे आणि शहरात कोठे तरी नोकरी किंवा कामधंदा पाहणे पसंत करतात. तथापि, हरिश्चंद्र यांनी शेतीशीच इमान राखण्याचा निर्धार करून आपले कौशल्य आणि कल्पनाशक्ती पणाला लावली आहे. 2018 मध्ये त्यांच्या गावात सरकारचा डीएसटी कार्यक्रम सुरू झाला. त्या अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱयांना शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी साहाय्य मिळू लागले. हरिश्चंद्र यांनी त्याचा लाभ उठवून आपल्या शेतामध्ये कल्पक पीक योजना केली. एका एकरात ते 50 वेगवेगळय़ा प्रकारची पिके घेतात. त्यामुळे एखाद्या पिकाची किंमत बाजारात कमी झाली तरी अन्य कोणत्या तरी पिकाची वाढलेली असते. त्यामुळे त्यांना तोटा होत नाही. तसेच त्यांनी जैविक शेतीवर भर दिला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अत्यंत मर्यादित आहे. अशा प्रकारे त्यांनी आज एक एकरमधून साधारणतः दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा नफा कोरडवाहू शेतीतून मिळविण्याचे तंत्र विकसित केले आहे.