मातीचे ढिगारे हटवून रस्त्याची दुरुस्ती केल्याने समाधान : विकासकामे वाहनधारक-रहिवाशांना बनली डोकेदुखीची
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रस्त्याच्या विकासासह जलवाहिन्या घालण्यासाठी विविध ठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. पण रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याऐवजी रस्त्यावर मातीचे ढिगारे ठेवले जात आहेत. त्यामुळे रविवारी रात्री रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मातीचे ढिगारे हटवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील विकासकामे वाहनधारकांना आणि रहिवाशांना डोकेदुखीची बनली आहेत. नियोजनबद्ध कामे करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी चरी खोदणे, ख•s खोदणे सुरू आहे. त्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. सध्या तिसरा रेल्वेगेट ते बसवेश्वर चौकापर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. त्याकरिता ठिकठिकाणी विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यावर सिमेंट पाईप घालण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे कामदेखील सुरू आहे. याकरिता ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. खोदाई केल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. त्याचप्रमाणे वाहनधारकांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेतली जात नाही. रस्त्यावर खोदण्यात आलेल्या चरीवरही मातीचे ढिगारे ठेवण्यात आल्याने रविवारी रात्री वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊन खानापूर रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मार्ग काढताना वाहनधारकांना तासभर अडकून पडावे लागले.
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल…
खानापूर रोडवर निर्माण झालेल्या गैरसोयींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन सोमवारी सकाळी रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटविण्यात आले व खोदण्यात आलेल्या चरीची दुरुस्ती करण्यात आली. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटविल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.