जीवीतहानीचे वृत्त नाही, इमारतींची पडझड, साहाय्यता कार्य सुरु
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नेपाळममध्ये भारताच्या सीमारेषेपासून साधाणरतः 150 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. 5.8 रिष्टर क्षमतेच्या या भूकंपाचे भारतातही जोरदार पडसाद उमटले. दिल्लीचा परिसर यामुळे हादरला. मात्र नेपाळ किंवा भारतात अद्याप जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळमध्ये भूकंपग्रस्त प्रदेशात काही इमारतींची पडझड झाली आहे. दिल्लीतही काही इमारतींना तडे गेले.
दिल्लीत या भूकंपाचे पडसाद किमान 15 सेकंदांपर्यंत जाणवले. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या इमारतींमधून त्वरित बाहेर पडले. तर सोशल मिडियावर भूकंपामुळे हलणारे फॅन्स, थरथरणाऱया खिडक्यांच्या काचा, पडलेली भांडी आणि घरांमधील इतर हालणाऱया वस्तू यांचे व्हिडीओ चित्रण प्रसारित करण्यात आले. भूकंपाचे पंधरा सेकंद अनेकांच्या मनात भीतीच्या लाटा उठवून गेले. मात्र, काही वेळातच धक्के थांबल्याने लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकत आपले व्यवहार सुरु केले.
भूकंपांच्या प्रमाणात वाढ ?
जगात गेल्या दोन वर्षांमध्ये भूकंपांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे, असे तज्ञांचे मत आहे. हे निसर्गचक्र असून त्यामुळे अधिक चिंतेचे कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाढत्या भूकांपांच्या संख्येचा थेट संबंध बदलत्या हवामानाशी नाही, असेही स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
दुपारीच्या वेळी धक्के
हा भूकंप मंगळवारी दुपारी साधारणतः 2 वाजून 28 मिनिटांनी झाला. पण दुपारी 3 वाजेपर्यंत दिल्ली आणि उत्तर भारताचा काही भाग येथे परिस्थिती स्थिरस्थावर झाली होती. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱयांना हे धक्के अधिक प्रमाणात जाणवले. नेपाळमधील या भूकंपाचे पडसाद दिल्लीतच नव्हे, तर उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबचा काही भाग, जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही जाणवले, अशी माहिती प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेतही घबराट दिल्लीचे महापौर निवडण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ती सुरु असतानाच भूकंपाचे धक्के बसण्यास सुरवात झाल्याने काहीकाळ सभागृहात घबराट उडाली आणि तेथील गोंधळ आणि गदारोळ थांबला. मात्र काही वेळातच भूकंप थांबल्याने महानगरपालिकेतील आरडाओरडा आणि गदारोळ पुन्हा सुरु झाला, अशीही माहिती देण्यात आली.